एकनाथ शिंदे पुन्हा करिष्मा! दुसरी जागाही बिनविरोध यवतमाळची आमदारकी फिक्स
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

यवतमाळ : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणुक होत आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याची उत्सुकता लागली होती. त्याचवेळी ठाण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आले आहेत. तर आता यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दृष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले आहेत.
यवतमाळ विधानपरिषद मतदारासंघातून बुधवारीच काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली होती. त्यावेळी याठिकाणी तीन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महाविकास आघाडी अपक्ष उमेदवाराला पाठींबा देऊन निवडणूक रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यासाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली मात्र या बैठकीला यस आले नाही. गुरुवारी तीन अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे या ठिकाणची निवडणुक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
यवतमाळ विधानपरिषद मतदारासंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निडून यावेत यासाठी मुंबईतून खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूत्रे हलवली. सुरुवातीला या ठिकाणी मंत्री संजय राठोड यांच्या पत्नीला दिलेली उमेदवारी त्यांनी रद्द केली तर त्यानंतर माजी आमदार दुष्यंत चुतर्वेदी यांना उमेदवारी देत त्यांना बिनविरोध निवडून आणले.
दरम्यान, यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातूनही मविआची काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या साहेबराव कांबळे यांनी निवडणूक रिंगणातून सपशेल माघार घेतली. कांबळे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ही निवडणुक चुरशीची होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या साहेबराव कांबळेंनी महाविकास आघाडीकडे निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही, असे म्हणत निवडणुकीतून माघार घेतली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे कांबळे यांनी निवडणुक रिंगणातून माघार घेतली.
विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा आज गुरुवार शेवटच दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.एकीकडे राज्यातील काही मतदारसंघात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. ही बंडखोरी मागे घेण्याचे आव्हान महायुतीसमोर असताना शेवटच्या दिवशी महायुतीने कमाल केली. यवतमाळसह अन्य काही ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.



Comments