छत्रपती संभाजीनगरचा पाणीप्रश्न पेटाला; अजित दादांनी स्थानिकनेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कान पिळले!
- Navnath Yewale
- May 4
- 2 min read

ऐन उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न पेटला आहे. जबाबदार यंत्रणेच्या निष्क्रीयेतेमुळे शहरवासीयांच्या नळाला 12 ते 15 दिवसांनी पाणी येते. गेल्या वर्षभरापासून ही परिस्थिती सत्ताधार्यांना बदलता आलेली नाही. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहेत. अशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी संभाजीनगरचा पाणी प्रश्न चिघळण्याला स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत भर सभेतून त्यांचे चांगलेच कान पिळले आहेत.
छत्रपती संभाजीनगर दौर्यावर असलेल्या अजित पवार यांना शहराच्या पाणी प्रश्नाबद्दल विचारले असता त्यांनी आपले रोखठोक मत मांडले कुठल्याही शहरामध्ये पिण्याचे पाणी हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आणि मूलभूत गरजेचा असतो योग्य नियोजन आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जर स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील प्रशासनाने पाणीपुरवठा योजना राबवल्या तर नागरिकांना त्याचा त्रास होत नाही. संभाजीनगर शहराचा वाढता व्याप पाहता या शहरासाठी दुसरी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे होते.
मात्र ती इतक्या वर्षात का हाऊ शकली नाही? याची माहिती आणि सध्या असलेल्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा मी विीागीय आयुक्तांकडून घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरुन विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 13 एप्रिल पासून शहरात ‘लबाडांनो पाणी द्या’ म्हणत जन आंदोलन सुरू केले आहे. येत्या 16 मे रोजी युवा सेनेचे प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या जन आंदोलनाचा समारोप मोर्चा काढून होणार आहे.
या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील पाणी प्रश्नाला स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जबाबदार धरत खडे बोल सुनावल्याने याची एकच चर्चा सुरू झाली आहे. शहरासाठी राज्य सरकारने 2018 मध्ये 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. केंद्र सरकारच्या अमृत योजनेत आता या पाणीपुरवठा योजनेचा समावेश झाल्यामुळे ती साडे सत्तावीसशे कोटींवर जाऊन पोहोचली आहे.
मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका, जिल्हा प्रशासन आणि या पाणीपुरवठा योजनेचे काम करणार्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ती रखडली आहे. सत्ताधारी पक्षाचे मंत्री, पालकमंत्री यांनी संभाजीनगरकरांना एप्रिल अखेरपर्यंत मुबलक पाणी मिळेल असे अश्वासन देऊन वेळ मारुन नेली. प्रत्यक्षात मात्र मे उजाडला तरी परिस्थिती जैसे थे आहे. आणखी किमान वर्षभरत तरी छत्रपती संभाजीनगरकरांना पाणी मिळणार नाही अशी वस्तुस्थिती आहे.
गेल्या आठवड्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून या पाणीपुरवठा योजनेचा ऑनलाईन आढावा घेतला होता. या योजनेतील सर्व त्रुटी तातडीने दूर करून योजना पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. मात्र अजूनही योजनेचे काम वेगाने पुढे सरकताना दिसत नाही. त्यातच आता अजित पवार यांनीही या पाणी प्रश्नावरुन स्थानिक नेत्यांना आणि प्रशासनाला जबाबदार धरले आहे.
Comments