top of page

जम्मू काश्मिरमध्ये मुसळधार; मोठे नुकसान, 4 जणांचा मृत्यू




जम्मू-काश्मिरमधील रामबन जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . राबमन जिल्हा सध्या एका भयानक नैसर्गिक आपत्तीचा सामाना करत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे, ज्यामुळे अनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या भूस्खलनामुळे वाहतुकिवरही परिणाम झाला आहे.


प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. सततचा पाऊस आणि वारंवार भूस्खलन यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, ज्यामुळे लोक त्रस्त आणि असुरक्षीत वाटत आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या राबन जिल्ह्यातील रविवारी पहाटे मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले.


भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प

याबाबत महिती देताना अधिकार्‍यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर नाशरी आणि बनिहाल दरम्यान अनेक ठिकाणी भूस्खलन आणि चिखल कोसळण्याच्या घटना घडल्या, ज्यामुळे वाहतूक थांबवावी लागली. रामबनच्या सेरी बागना गावात ढगफुटीत आकिब अहमद आणि मोहम्मद साकिब या दोन भावांसह तीन जणांचा दूर्दैवी मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.


40 निवासी घरांचे नुकसान

मृत्यूच्या ताज्या घटनांसह जम्मू प्रदेशात दोन दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री रियाशी जिल्ह्यातील अर्नास भागात वीज कोसळून एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला, धरमकुंड गावात अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे 40 निवासी घरांचे नुकसान झाले, सततचा पाऊस आणि ढगफुटीचा सामाना करत, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी 100 हून अधिक अडकलेल्या ग्रामस्थांना वाचविल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.


अनेक वाहने पुरात वाहून गेली !

नाल्याच्या पाण्यामुळे आलेल्या पुरात अनेक वाहने वाहून गेल्याचेही माहिती आहे. वाहतूक विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी नाशरी आणि बनिहाल दरम्यान अनेक ठिकाणी भूस्खलन, चिखल आणि दगड पडल्यामुळे वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. ते म्हणाले की, महामार्गावर पाऊस सुरुच आहे आणि हवामान सुधारेपर्यंत, रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवाशांनी मुख्य रस्त्यावरुन प्रवास करू नये असा सल्लाही वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान आणि कठीण भूभाग मोठ आव्हान!

मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे, ज्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. ही परिस्थिती विशेषत: मुले, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी गंभीर आहे, ज्यांना सर्वाधिक धोका आहे. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले असले तरी, खराब हवामान आणि कठीण भूभागाचे त्यांच्या प्रयत्नांसमोर मोठे आव्हान आहे. अधिकार्‍यांच्या माहिती नुसार मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उपायुक्त बसीर-उल-हक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने मौल्यवान जीव वाचवण्यासाठी केलेल्या तत्पर कारवाईबद्दल त्यांचे कौतुक केले.

Comments


bottom of page