top of page

निवडणुकीच्या आखाड्यात मुख्यमंत्री ठरले महायुतीसाठी ‘सुपरमॅन’ राज्यभरात 77 कार्यक्रमांना हाजेरी, 37 सभा, रोडशोचा उडवला धडाका

मुंबई: 15 जानेवारी रोजी होणार्‍या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रचाराची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासूनसुरू असलेल्या या धामधुमीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती.


या संपूर्ण प्रचार मोहिमेत सत्ताधारी महायुती आणि विशेषत: भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा काना कोपरा पिंजून काढला. आता प्रचाराची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या झंझावाती दौर्‍याची आकडेवारी समोर आली असून त्यांनी अतंत्य कमी वेळात राज्यभर सभा आणि रोड शोचा धडाका लावला होता.


निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकून 77 कार्यक्रमांना हाजेरी लावली. यामध्ये 37 मोठ्या सभा आणि रोड शोचा समावेश आहे. त्यांनी मुंबईमध्ये सर्वाधिक 7 सभा घेतल्या, तर त्यांच्या स्वत:च्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरमध्ये 5 सभा घेतल्या. पुण्यात दोन सभांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला.


याशिवाय सांगली, अकोला, जालना, परभणी, नांदेड, धुळे, लातूर, भिवंडी, उल्लासनगर, अहिल्यानगर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि नवी मुंबई या प्रत्येक शहरात त्यांनी प्रत्येकी एक सभा घेऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी मतांचे अवाहन केले.


केवळ सभाच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक शहरांमध्ये रोड शोच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या, इचलकरंजी, चंद्रपूर, अमरावती, जळगाव, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी त्यांनी जोरदार रोड शो केले. या थेट संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रचाराच्या या धावपळीत त्यांनी मुंबई पक्षाचा वचनामा देखील प्रकाशित केला, ज्यातून शहरांच्या विकासाचा रोडमॅप जनतेसमोर मांडण्यात आला.


प्रचारासारठी मुलाखतींचे सत्र: यावेळी प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबत घेतलेल्या मुलाखती. त्यांनी एकून 6 विशेष मुलाखती दिल्या, ज्यात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकरांचा सहभाग होता. ठाण्यात तेजश्री प्रधान आणि मिलींद बल्लाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये समीरा गुजर यांच्याशी त्यांचा संवाद झाला.


नागपूरमध्ये भारत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी, पुण्यात गिरीजा ओक, कोल्हापुरात कृष्णराज महाडीक आणि स्वप्नील राजशेखर तर पनवेलमध्ये प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर यांनी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. याव्यतिरिक्त त्यांनी विविध प्रसारमाध्यमांना 33 मुलाखती देऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली.


आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणाच्या वेळ आली आहे. 29 महानगरपालिकांच्या या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पक्रिया पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या झंझावाती प्रचाराचा महायुतील किती फायदा होतो आणि जनता कोणाच्या हाती सत्तेची चावी देते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Comments


bottom of page