पद्मश्री शब्बीर मामूंची गाईंच्या चारा-पाण्यासाठी धडपड!
- Navnath Yewale
- May 9
- 2 min read
175 गाईंचे संगोपन, चारा-पण्याची टंचाई; दावणीलाच गाईंची उपासमार, तहान भागवण्यासाठी पायपीट

दुष्काळ असो वा टंचाई संकटाला न डगमगता डोंगरा एवढ्या संकटाला मात करत शब्बीर मामुंनी आयुष्यात तसुभरही गोसेवेची निष्ठा ढळू दिली नाही. गायींच्या पिलांना दुधाची कमतरता भासू नये म्हणून कधी गाईंंंची धार काढली नाही. शिवाय दावणीची गाय कधी बाजारात अथवा व्यापारी, खाटकाला विकली नाही. अवघ्या चार गायींचा विस्तार आज शेकडो गायींमध्ये झाला आहे. शब्बीर मामुंच्या निस्वार्थ गोसेवेला केंद्र सरकारने 2020 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले. मात्र, पद्मश्री मिळाला असला तरी जनावरांच्या चारा-पाण्याचा संघर्ष मात्र पाचविलाच पुजलेला.
यंदा गायींना चरण्यासाठी असलेलं पठार वनव्याच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने जनावरांचा चारा जळून खाक झाला. डोळ्यादेखत जिवापाड जपलेल्या गायींची चार्या-पाण्या अभावी दावणीलाच उपासमार, तहान भागवण्यासाठी पाच किलोमिटर डोंगर वाटाची पायपीट, ते ही दिवसातून केवळ एकच वेळा तहान भागवण्याचा बाका प्रसंग गायींवर आलाय पद्मश्री त्यांच्या दावणीत टाकू का? आन..चारा-पाण्याचा प्रश्न मिटल का? अशा प्रश्नांचा भडीमार करताना पद्मश्री शब्बीर मामूृंच्या डोळ्याच्या कडा पान्हावल्या.

पहलगाममध्ये धर्म विचारून हल्ला करणारे दहशतवादी एकीकडे तर दूसरीकडे हिंदू धर्माची आस्था जपण्यासाठी कायम संघर्ष करणारेे पद्मश्री शब्बीर मामू व त्यांचे मुस्लिम कुटूंबीय. मराठवाड्यातील बीड हा कायम दुष्काळी, आवर्षणग्रस्त जिल्हा. उन्हाळ्याची चाहूल लागताच तीव्र चारा-पाणी टंचाई, इथं पाचविलाच पुजलेली. शिरुर कासार(जि.बीड) येथील पद्मश्री शब्बीर (मामू) सय्यद यांनी गेली सात दशकांपासून गोसेवाचा वसा घेतला आहे. अवघ्या चार गायींची आता लहान-मोठ्या 175 गायीपर्यंत संख्या पोहोचली आहे. विशेष म्हणजे शब्बीर मामु गाईंसह गोवंशाची विक्री करत नाहीत, परिसरातील गरीब शेतकर्यांना शेती कामांना कुणबीकीसाठी बैलं देतात. शिवाय परिसरातील शेतकरी टंचाईच्या काळात शब्बीर मामुंच्या गोशाळेत गायी आणुन सोडतात. शब्बीर मामुंची दोन मुलं, सुना, नातवंडे सगळ्यांनी गोसेवेत झोकून दिले आहे. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच चारा-पाणी टंचाईमुळे गायींची उपासमार ठरलेलीच.
शिरुर कासार, दहिवंडी गावशिवारातील राखीव वनक्षेत्रास लागून गायींना चरण्यासाठी मामुंच्या मालकीचा पठार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या पठारावर गायींंना वाळलेला चारा काही प्रमाणात उपलब्ध असतो. पण यंदा राखीव वनक्षेत्रात वनवा पेटल्याने शब्बीर मामुंचं खासगी क्षेत्रही जळून खाक झालं. त्यातच पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत असल्याने ग्रामपंचायतीकडूनही आठवड्यातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शब्बीर मामुंच्या गायींची चारा-पाण्या अभावी दावणीलाच उपासमार होत आहे.

मोदी सरकारने शब्बीर मामुंचा पद्मश्रीने गौरव केला असला तरी केवळ प्रतिष्ठेच्या व्यतिरिक्त पदरात काही पडले नाही. पद्मश्री मिळाल्या नंतर मुंबईस्थित एका सामाजीक संस्थेने निवार्याची सोय केली. पण कायमस्वरुपी चार-पाण्याचा प्रश्न जैसे-थेे राहीला. दरम्यान, पद्मश्री शब्बीर मामुंच्या गायींना उन्हाळ्यात कधी हिरवा चारा मिळालाच नाही, पण वाळलेल्या चार्यावरही यंदा नियतीने घाला घातल्याने जनावरं जगवण्याच्या चिंतेने पद्मश्री शब्बीर मामुंच्या कुटूंबाची झोप उडाली आहे. आम्हाला कोणाच्या एका पैशाचीही गरज नाही मात्र, दानशुरांनी गायींसाठी चारा- पाण्याची सोय करावी असे अवाहन पद्मश्री शब्बीर मामुंनी वृत्तमानससी बोलतांना केले.
मुस्लिम असूनही शाकाहारी : पद्मश्री शब्बीर मामुंच्या कुटूंबाने गोसेवेचा वसा घेतला असला तरी गायीला आईचा दर्जा देत मामुचे कुटूंबीय शकाहारीच्या आधिन आहे. कुटूंबातील सदस्य गायीलाच देव मानत असल्याने आम्ही शाकाहारीचे पालन करत असल्याचे मामूचे कुंटूंबीय सांगतात.
बछड्यांच्या पोषणासाठी गायींचं दुध काढत नाहीत: चारा- पाण्या अभावी गायींची उपासमार होते, त्यामुळे बछड्यांना आईचे पोषक पोटभर दुध मिळावे यासाठी गायीची कधीच धार काढली जात नाही. त्यामुळे गायीचं दुधही हे कुटूंब विकत नाही. आईच्या दुधावर पूर्ण बछड्याचा अधिकार असल्याचे सांगत शब्बीर मामूंनी घरगुती दुधासाठी एका म्हैसचे पालन केले आहे.
खताच्या उत्पादनातून संसारगाडा: गायींच्या बछड्यापासून दुधाची विक्री केली जात नसल्याने सहाजीक मग हा संसारगाडा कसा चालतो? असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडतो. पण गायीच्या शेन खतापासून मिळणार्या उत्पादनातून शब्बीर मामूंचा संसार गाडा चालतो असे ते अभिमानाने सांगतात.
Σχόλια