पुलवामा ते पहलगाम... हिंदूंच्या रक्ताचे सडे
- Navnath Yewale
- Apr 27
- 3 min read
हल्ल्याची गांभीर्यता कमी होते की काय अशी प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. किंबहुना या हल्याचा कठोर बदला घेऊन अतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल का अशीही शंका सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे .

नेहमीच भीतीचे वातावरण असलेल्या कश्मीर राज्यातील 'पहलगाम'च्या घटनेने भारताला पुन्हा एकदा हादरा बसला. निशस्त्र आणि निरपराध पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्यामुळे जगाने निषेध नोंदविला आणि क्षणाचाही विलंब न लावता अतिरेकी विरोधी लढ्यात भारताला पाठिंबा दिला. कोणताही देश असो त्या देशाची अर्थव्यवस्था मजबुत करणारा पर्यटक हा महत्वाचा घटक असल्यानेच जगाने या हल्ल्याची गांभीर्याने नोंद घेतली. हा हल्ला हिंदू धर्मावर होताच पण संपूर्ण मानवी संस्कृतीवर होता असे जगाचे म्हणणे आहे. तरीही या जागतिक घटनेला आम्ही हिंदू धर्मापूरतेच मर्यादित केले आणि व्हाट्सअप वर नको नको ते मेसेज फिरू लागले. देशातील राजकारण तापू लागले.
सत्ताधारी आणि विरोधकांनी पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. परिणामी देशात आणि जगात या हल्ल्याची गांभीर्यता कमी होते की काय अशी प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. किंबहुना या हल्याचा कठोर बदला घेऊन अतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल का अशीही शंका सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या 'पुलवामा' हल्याच्या नंतर असेच राजकारण तापले आणि कालच्या 'पहलगाम' च्या घटनेनंतर असेच वातावरण तापू लागले आहे. या दोन्ही घटनेत निरपराध हिंदूंच्या रक्ताचेच सडे सांडले याचा विसर राज्यकर्त्यांना झाला म्हणूनच अशा घटना वारंवार घडत आहेत याचेच भारतीयांना वाईट वाटते.
'पहलगाम' येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्यानंतर मागील चार दिवस संपूर्ण देशात याच विषयावर चर्चा होताना दिसत आहे. यात नेहमीप्रमाणे प्रसार माध्यमे अधिक आघाडीवर आहेत. प्रसार माध्यमावर विविध चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत. आपल्याला वेगळी बातमी कशी मिळेल याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असलेल्या चढाओढी मुळेच या हल्याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. प्रत्येक चॅनल मोठ्याने ओरडून इतरांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळी माहिती मिळाली आहे असे भासाविण्याचा सातत्याने प्रयत्न करू पाहत आहे. अनेकांनी तर हिंदुस्थान - पाकिस्तान च्या लढाईचे वातावरणही निर्माण केले. यामुळे या हल्ल्यानंतर सरकारची भूमिका नेमकी काय आहे! हे समजेनासे झाले आहे.
सारे काही रेटून नेले जात आहे असेच एकंदरीत चित्र दिसत आहे. मुळात अतिरेक्यानी आपल्या देशावर असा हल्ला पहिल्यांदाच केला आहे का! तसेही नाही. अनेक वेळा यापेक्षाही भयानक हल्ले झाले आहेत. पण यावेळी अतिरेक्यांनी एक पाऊल पुढे टाकत पर्यटकांना लक्ष करीत हल्ला केला. अतिरेक्यानी पर्यटकांवर हल्ला करण्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. यामुळेच या हल्ल्याची भारतासह साऱ्या जगाने गंभीरतेने तात्काळ दखल घेतली. सामान्यांमध्ये दहशत निर्माण करणे हाच उद्देश या पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामागे असावा.
तसे पाहिले तर आजपर्यंत कश्मीर मध्ये अनेक घटना घडल्या आहेत.
धुमशचक्री झाली पण ती सीमेवरील भारतीय जवानांन मध्ये आणि अतिरेक्यांमध्येच झाली. सीमेवरील जवानांनी असंख्य अतिरेक्यांना यमसदनी पाठविले तर अशा कारवाईत अनेक भारतीय जवान शहीद झालेत. पण सामान्यांना त्याचे चटके कधीच बसले नव्हते. चटके बसले ते सीमेवरील जवानांच्या कुटुंबाना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या पत्नीला. तेव्हा भारतीयांनी कधी ओरड केलेली फारसी दिसली नाही. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांसाठी मानवंदना देण्यासाठी सामान्यांनी कधी पुढाकार घेतलेला दिसला नाही.
15 ऑगस्ट हा दिवस सहलीचा दिवसच म्हणून साजरा केला. पण आज जेव्हा पर्यटकांवर हल्ला झाला तेव्हा सारेच हळहळ व्यक्त करीत आहे आक्रोश करीत आहेत. याचा अर्थ असा नाही की कोणी आक्रोश करू नये. पण जेव्हा अशा घटना घडतात त्या नेहमीच दुःखदायकच असतात. मग अतिरेक्यांचा तो हल्ला आमच्या सीमेवरील जवानांवर असो किंवा पर्यटकांवर असो याचा सर्वांनीच केवळ निषेध नाही तर तितक्याच प्रखरतेने विरोध करायला शिकायला हवे. या हल्यानंतरही निषेध कारण्यापलीकडे आम्ही काहीच केलेले दिसले नाही. सत्तेवरील मोदी सरकारने एकापाठोपाठ कठोर निर्णय घेतले. सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे पाकिस्तान आणि भारतात 1960 साली झालेल्या 'सिंधू जलकरारा'ला स्थगिती देण्यात आली. अटारी - वाघा सीमा तातडीने बंद करण्यात आली. पण पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना या मार्गाने 1 मे पर्यंत परत भारतात येता येईल.
'सार्क व्हिसा' वर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि या सर्वाना 48 तासात भारत देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत इतकेच नाही तर यापुढे हा व्हिसा दिला जाणार नाही असेही जाहीर करण्यात आले. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील संरक्षणविषयक सल्लागारांना आठवड्याभरात भारत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. आणि इस्लामाबादमधील भारताच्या उच्चायुक्तालयातील संरक्षणविषयक सल्लागारांना मायदेशी बोलावण्यात आले.
मोदी सरकारने तात्काळ उचललेल्या या कठोर पाऊलामुळे युद्धसदृश्य वातावरण निर्माण झाले. कारण सरकारने घेतलेले हे सारे निर्णय युद्ध होण्यापूर्वी घेतले जातात असे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळेच भारत पाकिस्तान मध्ये अधिक तणाव निर्माण झाला. तरीही सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे भारतीय नागरिकांनी जोरदार स्वागत केले. किंबहुना अतिरेकी निर्माण करणारा आणि अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तान ला कायमचा धडा शिकवावा जेणेकरून भविष्यात अतिरेकी निर्माण होणार नाहीत अशीही मागणी केली. भारतीयांचा मोदी सरकारला मिळत असलेला पाठिंबा पाहता सरकारने आणखी कठोर पावले उचलली आणि अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी जम्मू - कश्मीर मध्ये 'कोम्बिंग ऑपरेशन' सुरु केले. या कोम्बिग ऑपरेशन मध्ये अतिरेकी असिफ शेख याने घरात ठेवलेला बॉम्ब स्फोट झाल्याने त्याचे घर उडाले गेले. तर दुसरा अतिरेकी आदिल थोकरच्या अनंतनाग येथील घरावर बुलडोझर फिरवण्यात आला.
इथेच सरकार थांबले नाही तर 'पाकिस्तानी नागरिकांना राज्यातून बाहेर काढा' असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले. एकापाठोपाठ एक याप्रमाणे इतके सारे निर्णय सरकारने तात्काळ घेतल्याने युद्ध होणार अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे साहजिकच होते. त्यात त्यांचे काही चुकले असे वाटतं नाही. पण प्रसारमाध्यमांच्या मनात अशा भावना निर्माण होणे तितकेसे योग्य नव्हते. याचे कारण युद्ध म्हणजे काही पोरखेळ नाही. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार दिलेला इशाराचा मतितार्थ प्रसार माध्यमाना समजला नसावा. कारण पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीपासून स्पष्ट केले आहे की.. हा हल्ला ज्या अतिरेक्यांनी केला आहे त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा मिळेलच पण या हल्ल्याचा जो मास्टर माईंड आहे त्यालाही अशी शिक्षा मिळेल की सारे जग पाहत राहील.
यामुळेच साऱ्यांच्या भुवया पाकिस्तान कडे वळल्या.

पण जेव्हा जेव्हा भारतावर असा हल्ला केला जातो किंवा होतो त्यावेळी या हल्ल्याबाबत आपले नाव कसे गुंतले जाणार नाही याची पाकिस्तान नेहमीच काळजी घेत असतो. यामागे ISI चे डोके असते. मग ती मुंबईतील बॉम्ब स्फोटाची मालिका असो, कसाब यांनी केलेला मुंबईतील हल्ला असो, 'पुलवामा' येथील जवानांच्या गाडीवर झालेला हल्ला असो प्रत्येकवेळी पाकिस्तानने यातून स्वतःला वाचविले आहे. वेळ पडली तर असे हल्ले कारण्यासाठी ज्या म्होरक्याला पाकिस्तान गुप्तचर संघटनेने तयार केले आहे त्याच म्होरक्याचा खात्मा करण्याची मुभा देऊन प्रकरण शांत केले जाते. अमेरिकेचा Twin Tower हल्ला प्रकरणातील म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात जाऊन अमेरिकेने खात्मा केला. आणि प्रकरण शांत झाले. पुलवामा घटनेत 40 जवान शहीद झाले.
याबाबत भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यावर हे प्रकरण शांत झाले.
कारण भारताने बदला घेतला अशी भावना त्यावेळी प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. पण यामुळे ज्या पाकिस्तान देशात अतिरेकी निर्माण केले जातात आणि पोसले जातात तो बचावला जातो परिणामी अतिरेकी निर्माण करण्याचा कारखाना सुरूच राहतो आणि दोन चार वर्षांनी अशा घटना घडतच राहतात. मग ते सरकार कोणाचेही असो भाजपा चे असो वा काँग्रेस चे असो पाकिस्तानला काहीच फरक पडत नाही. ते सीमेवर आणि भारतात हल्ले करून अशांतता निर्माण करतच असतात. हे मात्र नक्की की भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर अतिरेक्यांनी तितकेसे धाडस केलेलं दिसत नाही. मागील झालेल्या हल्याचा हा सारा अनुभव पाहता यावेळी काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण पर्यटकांवरील हल्याचा मास्टर माईंड म्हणून तब्बल दोन दिवसानंतर सैफुल्ला खालिद याचे नाव पुढे आले आहे. यामुळे सैफुल्ला खालिद कोण आहे हे आम्हाला माहित नाही. त्याच्याशी किंवा त्याच्या संघटनेशी पाकिस्तान चा संबंध नाही असे सांगण्यास मोकळे झाले.
कोण आहे सैफुल्ला!

'पहलगाम' हल्ल्यामागील खरा सूत्रधार म्हणजेच मास्टर माईंड म्हणून सैफुल्ला खालिद याचे नाव पुढे आले आहे. याला सैफुल्ला खालिद कसुरी म्हणूनही ओळखले जाते. सैफुल्ला हा TRF चा डेप्युटी चीफ आहे. TRF म्हणजे 'द रेजिस्टेन्स फ्रंट' नव्याने स्थापन झालेल्या या संघटनेमधील अतिरेक्यांना प्रशिक्षण संचालकाची जबाबदारी सैफुल्ला जवळ आहे. सैफुल्ला याचा पाकिस्तानात भारी रुबाब आहे. महागड्या आणि आलिशान गाड्या, कडक सुरक्षा व्यवस्था सैफुल्ला च्या दिमतीला आहे. फुलांची उधळण करूनच सैफुल्ला चे सर्वत्रच स्वागत केले जाते. जागतिक दहशतवादी हाफिज सईद चा विश्वासू माणूस म्हणून सैफुल्ला ची ओळख आहे. म्हणूनच लष्कर - ऐ - तोयबा कडून सैफुल्ला याच्या TRF या संघटनेला पैसा पुरवीला जातो असेही म्हटले जाते. 2022 साली जम्मू - कश्मीर मध्ये भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत जे 172 दहशतवादी मारले गेले यामध्ये TRF संघटनेचे तब्बल 108 दहशतवादी होते. इतकेच नाही तर जेव्हा 100 दहशतवादी प्रशिक्षण घेऊन बाहेर आलेत त्यातील 74 दहशतवाद्यांची नेमणूक TRF या संघटनेने केली.
यावरून TRF संघटनेच्या व्याप्तीची कल्पना येते. असेही बोलले जाते की याच TRF संघटनेने फेब्रुवारी 25 मध्ये पाकव्याप्त कश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा एक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सैफुल्ला यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना इशारा दिला होता. या सर्व घटना पाहता 'पहलगाम' येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्या मागील सूत्रधार म्हणून सैफुल्ला याचे नाव पुढे आले आहे. या हल्ल्या विरोधात भारत सरकारने कठोर पावले उचलली असून ज्यांनी हा हल्ला केला त्या अतिरेक्यांना आणि त्याच्या सूत्रधाराला मोठ्यात मोठी शिक्षा दिली जाणार आहे असे जाहीर केले आहे. त्यातच भारतीय लष्कराने हल्ला करण्याची केलेली तयारी यामुळे 'पाकिस्तान'ला तर हादरा बसलाच आहे पण सैफुल्ला याच्या पायाखालील जमीनही हलू लागली आहे. भारतीय लष्कर गनिमी कावाने आपल्याला कधी खिंडीत गाठतील याचा नेम नसल्यानेच सैफुल्ला भीतीने बेजार झालेला दिसत आहे.

म्हणूनच 'पहलगाम' हल्ल्याशी माझा कोणताच संबंध नाही असे सैफुल्ला वारंवार सांगत आहे. सैफुल्ला यालाही माहित आहे की या सर्व घटनातून माझी सुटका होणे आता कठीण आहे. कारण या हल्यात पाकिस्तान चा हात नाही हे दाखविण्यासाठी सैफुल्ला चा बळी द्यावा लागण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI हे सारे जुळवून आणण्याची शक्यता अधिक आहे. जर या हल्ल्याचा मास्टर माईंड सैफुल्ला खालिद जर मारला गेला तर सारे काही शांत होईल आणि पाकिस्तानही वाचला जाईल. पण यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला होणारच नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण दहशतवादी निर्माण करण्याची फॅक्टरी पाकिस्तानात आहे. म्हणूनच भारतीयांचे म्हणणे आहे की केवळ मास्टर माईंड चा खात्मा करून भारतापुढील दहशतवादी हल्ल्याची समस्या सुटणार नाही. यासाठी भारताला दहशतवादी निर्माण करणारी फॅक्टरीच उध्वस्त करावी लागणार आहे. हे कितपत शक्य आहे ते येणारा काळच ठरवेल. तसे झाले नाही तर दहशतवादी हल्ले थांबतील असे म्हणणे चुकीचे ठरेल.
▪️हिंदू एकत्रित येतील का!
दहशतवादी संघटनेने एखादा हल्ला केला की देशातील हिंदूंनी एकत्रित यावे अशी साथ घातली जाते. व्हाट्सअप द्वारे निषेध नोंदवून सोशल मीडियावर ढकलून दिले जाते. सीमेवरील जवानांच्या बंदूकीतून ज्या वेगाने गोळ्या बाहेर पडतात त्यापेक्षा कितीतती वेगाने हिंदू जनता निषेधाचे मेसेज पसरवून मोकळे होतात आणि देशसेवा केल्याचे भासवितात. पण घरात बसून असे मेसेज पाठवून काय साध्य होणार आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. तरीही अर्थ नसलेले असे मेसेज पसरविले जातात. 'पहलगाम' हल्ल्याच्या निमित्ताने याचा अनुभव पुन्हा एकदा आला. हिंदूंना एकत्रित होण्याची हाक दिलीच पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे जर नाव विचारून हिंदूंना अतिरेक्यांनी मारले तर आपणही खरेदी करताना नाव विचारून खरेदी करा.. सोशल मीडियावरील या मेसेजचा किती परिणाम झाला हे पाहण्यासाठी मी गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस दक्षिण मुंबईतील पायधूनी, दवा बाजार, लोहार चाळ, अशा परिसरात फेरफटका मारला. पण सर्वच व्यवहार सुरळीत सुरु होते. कोणीही दुकानदारांना नावे विचारून खरेदी करत नव्हते. यावरून सोशल मीडिया हा पोरखेळ झाला आहे हे स्पष्ट दिसत आहे.
जेव्हा मराठी गुजराती भाषेचा वाद झाला तेव्हाही असाच मेसेज व्हायरल करण्यात आला. पण तेव्हाही नावे विचारून कुठल्याही मराठी माणसाने खरेदी केलेली दिसली नाही. हे सर्व पाहता हिंदू धर्मामधेच एकत्रिपणाची भावना नाही हे स्पष्ट दिसत आहे. कारण हिंदू धर्म हा अंधश्रध्येत आकंठ बुडालेला आहे. किंबहुना हिंदू धर्माची 33 कोटी देवांमध्ये विभागणी झालेली आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे प्रत्येक हिंदू माणसांचा देव वेगळा आहे त्याच्या देवाचे मंदिर वेगळे आहे. भगवान शंकर, गणपती, अंबा माता, महाकाली, अशा असंख्य देवता मध्ये हिंदूंची विभागणी झालेली आहे आणि हे कमी म्हणून की काय संत, महात्मे यांनाही देवांचे स्थान देऊन मंदिरात आणि घराच्या देव्हाऱ्यात बसाविण्यात आले आहेत. यामुळे हिंदू धर्मात जी एकोपाची भावना हवी ती सापडतच नाही.

त्याउलट दुसऱ्या धर्मात पहा त्यांचा एकच देव आहे. मुसलमान धर्मात कुठल्याही मशीद मध्ये जा अल्लाचेच नाव घ्यावे लागते. ख्रिस्त धर्मात पहा कोणत्याही चर्च मध्ये जा येशूलाच पाया पडावे लागते. शीख धर्मात कोणत्याही गुरुद्वारा पोहचा त्यांच्या वाहे गुरु जवळच माथा टेकावा लागतो. इतकेच काय बौद्ध धर्मातही गौतम बुद्ध एकच आहे. यामुळेच या सर्व धर्मात एकजूट दिसून येते. पण हिंदू धर्म या सर्वांपेक्षा संख्येने मोठा असूनही हिंदू धर्मात एकजूट नाहीच आणि एकत्रीपणाची बिलकुल भावना नाही. 33 कोटी देवांमध्ये हिंदू धर्म विखुरला गेला आहे. त्यामुळेच हिंदू एकत्रित येण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. याचाच फायदा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी उचलला आणि दहशतवादी हल्ले करून सातत्याने भारताला भीतीच्या छायेखाली ठेवले आणि ठेऊ पाहत आहे. कारण देवांमध्ये विभागलेला आणि अंधश्रद्धात अडकलेला हिंदू धर्मात एकजूट होऊ शकत नाही याची खात्री पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आहे. म्हणूनच थेट लढाई न करता आडमार्गाने जात छुपे युद्ध करून भारताला बेजार केले जात आहे.
याचे कारण भारताने घेतलेले मवाळ धोरण! जेव्हा अतिरेक्यांनी पाहिला हल्ला केला तेव्हाच कठोर धोरण भारताने जर घेतले असते तर भारतावर आज ही वेळ आली नसती. तेव्हा पाकिस्तानची ताकत तितकीसी नव्हती आणि आजही नाही आहे. भारतीय जवानांसमोर टिकावं लागणे कठीण आहे.म्हणूनच नुक्लिअर बॉम्ब ची पाकिस्तान नेहमीच धमकी देत असतो. कारण पाकिस्तान ला हे पक्के ठाऊक आहे की भारताच्या विरोधात असलेला 'चीन' पाकिस्तान ला मदत करेल. चीन च्या जोरावरच पाकिस्तान निश्चिंत आहे. हे पाहता 'पहलगाम' हल्ल्याचा बदला भारत कोणत्या पद्धतीने घेईल हे येणारा काळ ठरवेल. 'पुलवामा' हल्ल्याचा बदला ' सर्जिकल स्ट्राईक' करून संपवीला. दहशतवादी निर्माण करणारी पाकिस्तान मधील फॅक्टरी उध्वस्त केली नाही ती तशीच राहिली त्यामुळेच 'पहलगाम' मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला. या हल्लाचा बदला फक्त मास्टर माईंड सैफुल्ला पर्यंतच मर्यादित असेल तर यातून काहीच साध्य होणार नाही. पुलवामा, पहलगाम प्रमाणेच भविष्यातही हल्ले होत राहणार आणि हिंदूंच्या रक्ताचं सडे पडत राहणार!
सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक,
संपादक, 'वृत्तमानस' मुंबई,
रविवार दि. 27 एप्रिल, 2025
दूरध्वनी : 8928055927.*
Comments