top of page

फटाक्यांमुळे दिवाळी गोड की कडू ?

जगन घाणेकर


हिंदू धर्मातील सण, उत्सव केवळ मौज मजेसाठी असतात असे नव्हे, तर प्रत्येक सणामागील शास्त्र आणि ते कसे साजरे करावेत याबाबतचे सविस्तर ज्ञान आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी मांडून ठेवले आहे. ते तसे साजरे केल्यास मिळणारा लाभ अधिक असतो. गेल्या काही वर्षांत आपल्या सण उत्सवांत अनेक अपप्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे. या अपप्रवृत्ती एवढ्या हामी झालेल्या आहेत की सण उत्सवांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाऊ लागला आहे. वर्णभेद विसरून एकत्र येण्याची शिकवण देणाऱ्या गोपाळकाला सणामध्ये आता दहीहंडीच्या मनोऱ्यांचीच स्पर्धा रंगू लागली आहे. त्यावर लाखो रुपयांची बक्षिसे लावली जाऊ लागली आहेत. उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन राष्ट्र आणि धर्म याबाबत संघटितपणे कार्य करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या गणेशोत्सवामागील मूळ उद्देश बाजूला सरून प्रतिवर्षी गल्लीबोळांत नवनवीन मंडळे स्थापन होऊ लागली आहेत. गणेश मूर्ती, सजावट, मिरवणूक यांसारख्या कारणांनी मंडळांमध्ये तंटे होऊ लागले आहेत. नुकत्याच सरलेल्या नवरात्री उत्सवाचेही पुरते बाजारीकरण झाले आहे. येऊ घातलेला दिपावली सणही यातून सुटलेला नाही. दीपावली म्हटले की दिव्यांची रोषणाई, कंदिलांची सजावट, फराळाचा सुगंध यासारख्या बाबी डोळ्यासमोर यायला हव्यात; मात्र सध्या दिवाळी म्हटले तर सर्वात आधी आठवते ती सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी, त्यामुळे होणारा धुरच धूर, वाढणारे वायू प्रदूषण आणि कानठळ्या बसवणारे आवाज.


मुलांना कोणी सांगितले कि 'यंदा दिवाळीला कोणीही फटाके नाही फोडायचे' तर मुले त्याचे ऐकतील का ? अजिबात नाही. 'फटाके दिवाळीला नाही फोडायचे तर केव्हा फोडायचे ?' असा लागलीच त्यांचा प्रतिप्रश्नही असेल. अर्थात ही चूक लहानग्यांची अजिबात नाही. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त एवढ्या प्रचंड प्रमाणात फटाके फोडले जातात कि फटाके हीच दिवाळीची खरी ओळख आहे की काय असा प्रश्न पडतो. दीपावली शब्दाचाच अर्थ दीप +आवली अर्थात दिव्यांची रांग असा आहे. दीपावली हा दिव्यांचा उत्सव आहे. तिमिराकडून तेजाकडे म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची शिकवण दीप आपल्याला देतो. कोणी कितीही गरीब असला तरी त्याच्या घरी दिवाळी दरवर्षी साजरी होतेच. दिवाळीच्या निमित्ताने घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो, घराला रंगरंगोटी केली जाते, या सहा दिवसांत दाराबाहेर आकाशकंदील लावला जातो. दाराजवळ सुबक रांगोळी काढली जाते. दारात आणि तुळशीजवळ तेलाच्या पणत्या लावल्या जातात. घरोघरी लाडू, चकली कारंज्यांचा फराळ बनवला जातो. आप्तेष्टांना, मित्र मंडळींना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. हीच दिवाळी साजरी करण्याची परंपरागत पद्धत. या सर्वांत फटाके वाजवणे कुठेच बसत नाही, मग ही प्रथा दिवाळीत शिरली तरी कुठून ? एरव्ही लग्न समारंभ, उदघाटनाच्या कार्यक्रमांत, मिरवणुकांमध्ये आणि राजकीय सभांच्या वेळी आतषबाजी म्हणून फटाके फोडणे एकवेळ मान्य; मात्र दिवाळीसारख्या धार्मिक सणाचा आणि फटाके फोडण्याचा काय संबंध ?


सुमारे २२०० वर्षांपूर्वी चीनच्या लुईयाँग प्रांतात फटाके फोडल्याचा संदर्भ आढळतो. आगपेटीच्या काडीप्रमाणे काठ्यांच्या टोकाला ज्वालाग्राही पदार्थाची गाठ बनवली जाई आणि ही गाठ आगीत धरल्यावर तिचा आवाज येत असे. ही आतषबाजी पुढे लग्नसमारंभांना होऊ लागली. १९२३ मध्ये भारतातील कोलकात्यामध्ये नाडर बंधूंनी आगपेटीच्या कारखान्यांमध्ये सर्वप्रथम फटाक्यांची निर्मिती केली. १९४० मध्ये तामिळनाडूतील शिवकाशी येथे फटाक्यांचा पहिला कारखाना सुरु झाला. तेव्हापासून आजतागायत शिवकाशी मध्ये अविरतपणे फटाक्यांची निर्मिती सुरु आहे. आजमितीला शिवकाशी येथे फटाक्यांचे मोठमोठे कारखाने तयार झाले आहेत. येथून संपूर्ण भारतात फटाके पुरवले जातात. शिवकाशी येथे तयार केल्या जाणाऱ्या फटाक्यांना भारतभरातून विशेष मागणी आहे. दिवाळी सणाला सहस्रो वर्षांचा इतिहास आहे आणि फटाके बनवणारा पहिला कारखाना भारतात ८४ वर्षांपूर्वी तयार झाला आहे याचाच अर्थ दिवाळीत फटाके फोडण्याच्या प्रथेला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पूर्वीचे राजे महाराजे आनंदाच्या क्षणी आतषबाजी करत असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. ही आतषबाजी आता फटाक्यांच्या रूपाने दिवाळीत सर्वत्र होऊ लागली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या किंवा सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांत आतषबाजी करण्याची प्रथा पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा आहे, मात्र ही आतषबाजी केवळ शोभेच्या फटाक्यांपुरती सीमित असते. आपल्याकडे मात्र शोभेपेक्षा अधिकाधिक आवाजाच्या फटाक्यांचीच स्पर्धा प्रतिवर्षी पाहायला मिळते.


दिवाळीच्या तोंडावर दरवर्षी प्रशासनाकडून फटाके फोडण्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली जाते ज्यामध्ये आवाजाच्या मर्यादेपासून फटाके फोडण्यासाठीची निषध्द क्षेत्रेही नमूद केलेली असतात. मात्र शहरासारख्या ठिकाणी या नियमावलीला सर्रासपणे हरताळ फासला जातो. सर्वत्रच फटाक्यांची आतषबाजी सुरु असल्याने कारवाई तरी कोणावर करणार, असा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर असतो. २०२१ साली भारतभरात सुमारे १५०० कोटी रुपयांचे फटाके केवळ दिवाळीच्या दिवसांत फोडले गेले. यंदा हा आकडा याहून अधिक असेल. आजमितीला लोकसंख्येत अव्वल असलेल्या भारतातील बराचसा भाग दारिद्र्यरेषेखाली जीवन कंठत आहे, ज्यांना दोन वेळेचे पोटभर अन्न मिळणेही दुरापास्त आहे. देशातील कित्येक गावे कुपोषित आहेत. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. अशा परिस्थितीत केवळ क्षणिक मौजेखातर फटाक्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची राख-रांगोळी करणे कितपत योग्य आहे ?


शिवकाशी हे ठिकाण अव्वल दर्जाचे फटाके बनविण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे; मात्र याच शिवकाशीमध्ये दरवर्षी फटाक्यांच्या कारखान्यांना आगी लागून जीवित आणि वित्तहानी होण्याच्या अनेक घटना घडत असतात. या कारखान्यांतील दारूच्या प्रभावामुळे कारखान्यांत काम करणाऱ्या कितीतरी लहान मुलांना, कामगारांना असाध्य आजार जडतात, कायमचे अपंगत्व येते. याशिवाय दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांच्या गोदामांना, दुकानांना आगी लागल्याच्या अनेक बातम्या दरवर्षी वाचनात येतात. फटाके फोडताना कित्येक जण भाजतात, जळके फटाके इतरत्र उडाल्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात ज्यामध्ये दरवर्षी शेकडो जण मृत्युमुखी पडतात तर हजारो जण जखमी होतात. याकाळात अग्निशमन दलावर प्रचंड ताण असतो. याशिवाय केवळ फटाक्यांच्या कारणावरून अनेक ठिकाणी भांडणे, मारामाऱ्या होतात त्या वेगळ्या.


वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याकडे दरवर्षी अधिकाधिक आवाजाच्या फटाक्यांची स्पर्धा लागलेली पाहायला मिळते. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे इमारतींना तडे जातात, खिडक्यांच्या काचा फुटतात तसेच सिलींगचे प्लास्टरिंग सैल होण्याचाही धोका असतो. विजेचे काचेचे बल्बही फटाक्यांच्या आवाजामुळे फुटतात.


दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे लोकांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांमुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. अतिआवाजामुळे कान बधीर होतात. श्रवणयंत्रणातील पेशी एकदा मृत झाल्या की, त्या पुन्हा नव्याने निर्माण होत नाहीत. गर्भवती महिला, दीर्घ आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण आणि नवजात बालके यांच्यावर फटाक्यांच्या आवाजाचा भयंकर परिणाम होतो. मायग्रेन, रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या त्रासामध्ये फटाक्यांच्या अतिआवाजामुळे अधिक वाढ होण्याची शक्यता असते. फटाके फोडल्यावर निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे प्रचंड वायुप्रदूषण होते ज्याचा त्रास लहान मुलांसह अस्थमा आणि फुफुसाचा आजार असलेल्यांना अधिक होत असतो.

अमेरिकेसारख्या विकसित देशात मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. न्यूझीलंड, इटली, फ्रान्स, बेल्जियम या देशांत केवळ प्रौढ व्यक्तींनाच फटाके विकत घेण्यास आणि फोडण्यास अनुमती आहे. आपल्याकडे मात्र असे कोणतेही धोरण प्रशासनाने आखलेले नाही. उलट इथे घरातील प्रौढच फटाके आणून ती लहानांना फोडण्यासाठी उपलब्ध करून देतात.


दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरात श्री महालक्ष्मी आणि श्री कुबेराचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही धनाची देवता आहे तर कुबेर हा धनसंचयाचा देव आहे. एकीकडे योग्य मार्गाने धन प्राप्ती होण्यासाठी देवी लक्ष्मीची आणि आलेले धन टिकून राहावे यासाठी कुबेराची पूजा करायची आणि दुसरीकडे लक्ष्मीच्या कृपेने मिळालेले धन फटाक्यांच्या माध्यमातून विनाकारण व्यय करायचे हा विरोधाभास नव्हे काय ?


प्राचीन युगात राक्षस नागरिकांना त्रास देऊन असुरी आनंद मिळवायचे. आताच्या काळी फटाके फोडून इतरांना त्रास देऊन साजरा केल्या जाणाऱ्या आनंदाला असुरी आनंदच म्हणावे लागेल. आपल्याला एखादा आजार झाला कि त्यावर वेळीच उपचार घेऊन आपण त्याचे निराकरण करतो. फटाक्यांच्या रूपाने आपल्या हिंदू संस्कृतीतील दीपावली सारख्या व्यापक आणि सात्विक सणाला एकप्रकारचा आजारच जडला आहे. तो दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दीपावलीच्या तेजाला लागलेली फटाक्यांची काजळी दूर करून तिला पुनर्रतेज प्राप्त करून द्यायचे असेल, तर सुरुवात आपल्या घरापासूनच करावी लागेल.


जगन घाणेकर

घाटकोपर, मुंबई

1 view0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page