top of page

मुंबई महापालिका निवडणूकीसाठी, राज ठाकरे शिंदेना टाळी देणार!





मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच पक्षाकडून गोळाबेरीज सुरू आहे. मुुंबई पालिकेवर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिली आहे. गेल्या अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे महायुतीसह निवडणूकीची सर्वच पक्षाने आतापासूनच जय्यत तयारी सुरु केली आहे.


उद्धव ठाकरेंचा गड असलेल्या मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आता भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच आता महायुतीमध्ये मनसेला सोबत घेण्याची रणनीती महायुतीने आखली असल्याचे समजते. त्याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे.


आगामी काळात होत असलेल्या पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी भेटीचे परफेक्ट टायमिंग साधल्याचे बोलले जात आहे. मुंबई पालिका निवडणूकीचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या गटाची ताकद दिसली आहे.


मुंबईत ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणूकीतही ठाकरे गटाने चांगले वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. तर एका ठिकाणी अवघ्या 48 मतांच्या फरकाने अमोल किर्तीकर पराभूत झाले आहेत. दूसरीकडे महायुतीला लोकसभेच्या केवळ दोन जागा जिंकता आल्या. या सर्व बाबीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही.


ठाकरे गटाची मुंबईत मोठी ताकद आहे. त्यांच्या विरोधात महायुतीला एकत्रच लढावे लागणार आहे. त्याशिवाय आणखी काही बेरजेचे राजकारण करत असताना मनसेसारखे पक्ष सोबत घ्यावे लागणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मनसे स्वबळावर लढण्याचा तोटा महायुतील सहन करावा लागला. मनसे निवडणूक रिंगणात उतरल्याने काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता.


त्यामुळेच आता या निवडणूकीत महायुतीने ताकही फुंकून पिण्याची रणनीती आखली आहे. मुंबईत जर उद्धव ठाकरेंचा सामना करायचा असेल तर राज ठाकरे यांना सोबत घेणे गरजेचे आहे. हे ओळखून महायुतीने पत्ते टाकण्यास सुरवात केली आहे. येत्या काळात जर एकनाथ शिंदे यांच्या सोबत हातमिळवणी केल्यास मनसेला देखील सत्तेत येण्याची संधी मिळू शकते, अशी या मागची रणनीती आहे.


विधानसभा निवडणूकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव राज ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या दोन नेत्यांच्या भेटीनंतर युतीबाबत काय निर्णय होणार? याकडे राज्याचे लक्ष आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना व मनसे या दोन पक्षांची मराठी अस्मितेवर आधारित भूमिका असल्याने त्यांचे मतदारसंघ बर्‍याच अंशी समान आहेत. त्यामुळे येत्या काळात जर मराठी मतांची मतविभागणी टाळायची असेल तर या दोन्ही पक्षाला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे लागणार आहे. पालिका निवडणूकीसाठी महायुतीला येत्या काळात मुंबईत मनसेचा आधार उपयोगी ठरु शकतो.


वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसेने स्वबळावर लढवली होती. त्यामुळे आता पालिका निवडणूकीत त्यांची भूमिका काय असणार याची उत्सुकता आहे. नुकत्याच झालेल्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महापालिका निवडणूकीविषयी कुठलेच मत व्यक्त न करता सस्पेन्स कायम ठेवला होता. त्यामुळे येत्या काळात ते कोणती भूमिका घेणार? हे पहावे लागणार आहे.

होवू घातलेल्या मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर या दोन नेत्यांची भेट महत्वाची मानली जात आहे. त्याशिवाय या दोन पक्षात विधानसभा निवडणूकीवेळी कटूता निर्माण झाली होती. दोन्ही पक्षातील कटुता दूर करण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. तर ही अनौपचारीक भेट असल्याचे मनसे नेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे महायुतीसोबत जाणार का? याची उत्सुकता आहे.

Comments


bottom of page