वटवृक्ष पुनर्जन्मोत्सव; नामकरण सोहळा आनंदवनात साजरा.
- Navnath Yewale
- Oct 8
- 1 min read
उपसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते वटवृक्षाचे "सिद्धार्थ वड" नामकरण.

आहिल्यानगर: आनंदवन,वनविभागा, ग्रीन क्लब पाथर्डी, गिरीकर्निका फाउंडेशन, पर्यावरण संवर्धन व संरक्षण चळवळ पाथर्डी, सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव, सिद्धिविनायक प्रतिष्ठान तिसगाव, वन व्यवस्थापन समिती सद्गुरुवाडी मांडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवे ता. पाथर्डी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त आनंदवन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमात वटवृक्ष पुनर्जन्मोस्तव व निसर्ग सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक अमोल सातपुते हे होते. त्यांच्या हस्ते पाथर्डी इथून तिसगाव येथील आनंदवनात पुनर्वशीत केलेल्या वडाच्या झाडाचे नामकरण " सिद्धार्थ वड" केले.
आनंदवन व बालानंद परिवाराने पाथर्डी पंचायत समितीच्या आवारातील वादळात उन्मळून पडलेल्या महाकाय वटवृक्षाला क्रेनच्या सहाय्याने त्याचे आनंदवनात पुनर्रोपन करून त्याला जीवदान दिले. त्याच वडाच्या ७५ फांद्यांची लागवड करून आनंदवनात 'वडवन' तयार केले. या वडाला आपलं अवघं आयुष्य सर्परांज्ञी प्रकल्पाच्या माध्यमातून वन्यजीवांच्या संरक्षण, संवर्धन आणि जतनासाठी समर्पित करणारे वन्यजीवांचे पिता सिद्धार्थ सोनवणे यांचे नाव दिले. त्या ठिकाणी लेझर कटिंग मध्ये सिद्धार्थ सोनवणे यांचे कट आउट संदीप राठोड ,प्रा.सूर्यकांत काळोखे, लहू बोराटे , राकेश पवार यांच्या संकल्पनेतून बसवण्यात आला. हा नामकरण व अनावरण सोहळा साताऱ्याचे उपवनसंरक्षक श्री.अमोल सातपुते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमातच निसर्गा विषयी प्रामाणिक व वेगळं काम करणारे निसर्ग मित्र अमित गायकवाड, पत्रकार श्री.चंद्रकांत गायकवाड, चित्रकार श्री.राम फड सर व शुभम चंदनशिवे यांना उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते निसर्ग मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सिद्धार्थ सोनवणे, दैनिक दिव्य मराठीचे सहसंपादक श्री.अनिल हिवाळे , सहाय्यक उपवनसंरक्षक राहुरी गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी तिसगाव अरुण मिसाळ आदी उपस्थित होते .अमोल सातपुते यांनी सिद्धार्थ सोनवणे यांच्याकामाचा आढावा घेतला आनंदवन या ठिकाणी सुरू असणाऱ्या कामाचे कौतुक केले. 'प्रत्येक पान, फूल, झाडातून आनंदवन बोलते' असे सांगत त्यांनी निसर्गाच्या प्रत्येक घटकाचे महत्त्व पटवून दिले. निसर्गाशी संवाद साधण्याचे फायदे त्यांनी सांगितले आणि प्रत्येकाने झाड लावून त्याचे संगोपन करण्याची गरज व्यक्त केली.
त्यांनी आनंदवन म्हणजे केवळ वृक्षारोपण नसून, ती एक मानवी जीवनशैली आहे असे सांगितले.ही प्रामाणिक माणसं खऱ्या अर्थाने निसर्ग संवर्धनासाठी मनापासून झटत आहेत असे सांगितले. आनंदवनला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही साहेबांनी दिलं. या सत्रांसह उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री.गणेश कांबळे सर यांनी केले. या सत्राच्या समारोपाला अमोल दादा व श्वेताने सादर केलेली नाटिका संपूर्ण कार्यक्रमाचा सार होता. अगदी काही तासांच्या सरावातून दोघांनी सादर केलेली नाटिका संपूच नये असं वाटत होतं. आपल्या कसदार व बहारदार अभिनयाने दोघांनीही उपस्थितांची मनं जिंकली.
आनंदाश्रू अनावर
'सिद्धार्थ वड' हे नाव पाहून सिद्धार्थ सोनवणे यांना आनंदाश्रू अनावर झाले. उपस्थित सर्वजण भावनिक झाले. मैत्रीचा हा अनोखा संगम ज्यांनी-ज्यांनी अनुभवला त्यांचे जीवन नक्कीच कृतार्थ झाले. हा सन्मान होता निसर्गासाठी आपलं आयुष्यं वाहून घेतलेल्या एका निसर्ग मित्राला चराचरातील प्रत्येक घटकांकडून यांच्या कामाला दिलेली ती मानवंदना होती.



Comments