top of page

सचिन आहिर यांच बंड, सुषमा अंधारेंची खदखद?

मुंबई: वरळी मतदारसंघात मजबूत पकड असलेले नेते सचिन आहिर यसांच्या पक्षप्रवेशानंतर आता शिंदे गटाने ठाकरेंच्या शिवसेनेत आणखी काही आमदारांना गळाला लावण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आणखी काही आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमिवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.


दरम्यान, सुषमा अंधारे या देखील नाराज असून सचिन आहिर यांनी त्यांनाही शिंदे गटात नेण्याचा प्रयत्न केला होता, या चर्चांवर सुषमा अंधारे म्हणाल्या‘ एक लक्षात घ्या, कदाचित असं असू शकतं की त्यांनी (सचिन आहिर) मला फोन केला म्हणजे ते मला काहीतरी बोलणार असतील, मात्र आमचं बोलणं किंवा भेट झाली नाही. त्यांनी म्हटल की 29 तारखेला आमचं भेटायचं ठरलं होतं, पण 29 तारखेला मी गेलेच नाही. ते मला हे सगळं सांगणार होते की नाही, याची आता मी खात्री देऊ शकत नाही. राहिला प्रश्न माझ्याशी संबंधित चर्चेचा, तर मी त्यांचे फोन कट करत होते, कारण मी ‘मातोश्री’वर होते. अनिल देसाई दिल्लीला जाणार होते, त्यामुळे तातडीने पुण्यातल्या पदाधिकार्‍यांची काल मुंबईत बैठक बोलावली होती, ज्याची तुम्ही पडताळणी करू शकता. विनायक राऊत यांनी पुण्यातल्या महत्वाच्या शहरप्रमुखांसह संपर्कप्रमुख आणि पिंपरी- चिंचवडच्या सर्व पदाधिकार्‍यांना तातडीने बोलवले होते. काल संध्याकाळी सेनाभवन येथे ही महत्वाची बैठक पार पडली. आम्ही सगळे तिथे होतो आणि मी काल अख्खा दिवस पक्षप्रमुखांच्या (उद्धव ठाकरे) संपर्कात होते. पण आता अडचण अशी आहे की, इतके सगळे विश्वासू शिलेदार अशा पद्धतीने जात आहेत की, कोणावरही शंका येणे फार स्वाभाविक आहे. त्यामुळे तुमच्या मनात अशा शंका येणे फारच रास्त आहे.”


उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे, विश्वासू आणि त्यांच्या मुलाखती दरम्यान शेजारी खाली मांडी घालून बसणारे काही नेतेही येणार्‍या काळात शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर अंधारे म्हणाल्या“ अमुक आमदार, तमुक आमदार यांच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आम्ही तुमच्याच माध्यमातून ऐकत आहोत. पण मला असं वाटतं की, जेव्हा लढायचं ठरवलेलं असतं, त्यावेळेला यावर बोलणं कठीण आहे. हेही तितकंच खरं आहे की, समजा 29 तारखेला सचिन भाऊंनी मला फोन केला, तेव्हा मी त्यांना ‘ सचिन भाऊ’ म्हणणार आणि आज त्यांना गद्दार म्हणणार. म्हणजेच दोन तासांपूर्वी जो माणूस मला वाघ वाटत होता, तो दोन तासांनंतर गद्दार वाटायला लागला, तर माझ्या पारखी नजरेतून काही चूक झाली आहे का, असं मला म्हणावं लागेल. प्रत्येक गोष्टला लगेच ‘ ब्लॅक अँड व्हाईट’ (काळे किंवा पांढरे) बघण्याची गरज नाही, तिथे ‘ग्रे शेड’ देखील असू शकते. पण नेमकं काय घडलं ते मात्र कळत नाही. आमदारांचं काय चाललंय ते आमदारांनाच माहिती. काय खरं काय खोटं; परंतु हे नक्की की, त्या दिवशी उद्धव साहेबांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीला सचिन भाऊ उपस्थित नव्हते.”


अंधारे पुढे म्हणाल्या, “ सकाळी 11 वाजता ज्यावेळी ते विधिमंडळात प्रवेश करतात, तेव्हा सगळ्यांना हाय- हॅलो करतात. जसं भाई जगतापांनी सांगितलं, तोपर्यंत सगळं ओके असतं. पण पुढच्या पाच मिनिटांत ते जातात, सही करतात आणि लगेचच गद्दार होतात, असं देऊ शकत नाही. कुठे ना कुठे काही तरी मिसिंग आहे आणि ते शोधलं पाहिजे. आतापर्यंत पक्ष सोडून जाणारे सर्वजण बघा, ज्यांना पक्षाने खूप काही दिले, किंबहुना दिल्यामुळेच त्यांची ‘ बार्गेनिंग पॉवर’ वाढली. त्या बार्गेनिंग पॉवरच्या बळावर त्यांनी आपापल्या जागा वेगवेगळ्या पक्षात जाऊन काबीज केल्या. मात्र, ज्यांना कधीच काही मिळालं नाही, तो सर्वसामान्य शिवसैनिक आजही इथेच लढत आहे. किमान आतातरी या शिवसैनिकांना संधी मिळायला हवी. नव्या शिवसैनिकांना संधी दिली पाहिजे. मी लोकसभा उमेदवारी वाटपाच्या वेळीही आग्रह धरला होता की, आष्टीकरांना उमेदवारी दिली जाऊ नये , कारण हा माणूस कधीही फुटू शकतो.”


शिंदे गटाच्या प्रवेशाच्या टायमिंगवर बोलताना अंधारे म्हणाल्या, “यांची काम करण्याची पद्धत पाहिली तर

पहिल्या वर्धापन दिनाला मनीषा कायंदे यांचा प्रवेश, दुसर्‍या वर्धापन दिनाला नीलम गोर्‍हे यांचा प्रवेश, या वर्धापन दिनाला सहा खासदारांचा प्रवेश आणि आता नेमका उद्धव साहेबांचा दौरा सुरू असतानाच इकडे सचिन आहिरांचा प्रवेश आणि आता नेमका उद्धव साहेबांचा दौरा सुरू असतानाच इकडे सचिन आहिरांचा प्रवेश! हे सगळं बघितलं, तर ठरवून, जाणीवपूर्वक सूड उगवणं किंवा ‘ रक्तरंजित दुश्मनी’ निभावणं असं हे सुरू आहे. हे शब्द खूप टोकाचे (हार्ष) आहेत, पण अशा पातळीचे राजकारण सध्या सुरू आहे, जे महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. मला खरंच वाईट वाटतं जेव्हा जुम्ही माझ्याबद्दलही शंका घेऊन प्रश्न विचारता, पण परिस्थिती अशी झाली आहे की आता स्वत:च्या सावलीवरही विश्वास ठेवावा का? कारण उद्धव साहेबांच्या आसपास दिसणारे, मातोश्रीवर 24 तास राहणारे, या सगळ्यांच्याच कडे आता संशयी नजरेने बघितलं जाऊ शकतं. अशी स्थिती निर्माण झाली आहे,”


पक्षप्रमुखांच्या दौर्‍याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “ ज्या दिवसापासून हा दौरा सुरू झाला, मला वाटतं ते नागपूर विमानतळावर गेले होते. त्याच दिवशी संध्याकाळी जर यवतमाळची सभा झाली असती, तर पुढच्या ठिकाणच्या सभा आणि बैठकांना वेळा मिळाला असता. मात्र सभा दुसर्‍या दिवसापासून सुरू झाल्यामुळे यवतमाळ- वाशिम एका दिवशी, मग पुन्हा हिंगोली, पुन्हा परभणी अशी धावपळ झाली. धाराशिवरून परभणीला येत असताना पाऊस होता, त्यामुळे कदाचित काही बैठका राहिल्या असतील. परंतु या सर्व लोकांना पुन्हा एकदा मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी बोलले जाईल आणि समजून घेतले जाईल,”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना अंधारे म्हणाल्या “ एकनाथ शिंदे रोज छोटी- मोठी ऑपरेशन करत राहणार. म्हणजेच ते राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आलेले नाहीत. मुख्यमंत्री पदाची जी ताकद प्रोटोकॉल आणि शक्ती आहे, ती सगळी शक्ती ते केवळ फोडाफोडीसाठी वापरत आहेत. मला वाटतं की, फडणवीसांच्या सोबत राहून “ ढवळ्याशेजारी बांधला पोवळा , वाण नाही पण गुण लागला” अशी त्यांची अवस्था झाली आहे. सोबतीमुळे तो गुण वाढीस लागला असेल. कारण महाराष्ट्रातले प्रश्न काय आहेत, यापेक्षा दुसर्‍यांचे पक्ष कसे फोडता येतील, याकडेच या मंडळीचे जास्त लक्ष आहे.


पुण्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना अंधारे यांनी नीलम गोर्‍हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “पुण्यामध्ये जेव्हा निर्लेकरजी किंवा उदयभाऊ संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते, तेव्हा माझा शिवसेनेशी संबंध नव्हता. मी चळवळीत असल्यामुळे शिवसेनेत काय सुरू आहे, याची मला कल्पना नव्हती. परंतु मी पुण्यात आल्यापासून नीलम गोर्‍हे यांचा जो कार्यकाळ पाहिला, त्यावरून त्या फक्त शरीराने इथे होत्या, मनाने त्या पूर्णपणे ‘भाजपमय’ होत्या. नीलम गोर्‍हे यांनी पुण्यात चालवलेली शिवसेना ही शिवसेना नसून ती ‘ बापट सेना’ होती. बापटांना कोणते उमेदवार हवेत? बापटांना कशा पद्धतीची निवडणूक हवी आहे? अशाच पद्धतीने नीलम गोर्‍हे काम करायच्या. त्याची बक्षिशी म्हणून निलम गोर्‍हे यांच्या खुर्चीला कधी धक्का लागत नव्हता, कारण त्या फार उत्कृष्टपणे ते मॅनेज करायच्या. कालच्या घडामोडींमध्ये जर तुम्ही नीट निरिक्षण केलं असेल तर सगळ्यात जास्त सुतकी (उदास) चेहरा कोणाचा झाला असेल, तो निलम गोर्‍हे यांचा झाला होता.”


“ हा संवादाचाही अभाव असू शकतो, कारण कार्यकर्त्यांकडून फीडबॅक जात नाही असं नाही. आष्टकरांबद्दल जसा फीडबॅक गेला होता, तसा ओमराजेंच्या बद्दल एक फीडबॅक आम्ही विधानसभेच्यावेळी दिला होता. ज्या क्षणी कैलासवासी आमदार ज्ञाणेश्वर पाटील यांच्या यांच्या चिरंजीवांची उमेदवारी भूम- परंडामधून जाहीर झाली होती आणि ती उमेदवारी ओमराजेंनी माघार घ्यायला लावली, तेव्हाच आम्ही म्हणत होतो की ‘ समथिंग इज फिशी’. आपण ओमराजेंच्या म्हणण्यावरून ही उमेदवारी माघारी घेणे चुकीचे होते. या सगळ्यामध्ये ओमराजेंची आणि श्रीकांत शिंदेंची मैत्री कधीही लपलेली नव्हती. हा सगळा फीडबॅक असतानाही नेतृत्वाने याकडे लक्ष का दिले नाही, हा एक मोठा प्रश्न आहे,”


त्यांच्या वैयक्तिक भूमिकेविषयी आणि सचिन आहिर यांना मिळणार्‍या लाल दिव्यांच्या गाडीत भावासोबत बसणार का? विचारले असता त्या म्हणाल्या “ त्या लाल दिव्याच्या गाडीत कोणीही बसायचं नसतं, त्याचा एक प्रोटोकॉल असतो. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे की, तुम्ही मला सचिन आहिरांची बहीण म्हणता. मात्र, मला असं वाटतं की कुरुक्षेत्राच्या मैदानावर जेव्हा युद्ध सुरू असतं, त्यावेळेला नाती मोठी की, आपल्याला सांगितलेला धर्म मोठा? तर धर्म जास्त मोठा असतो एका अर्थाने ही सगळी धर्मयुद्धे आहेत आणि इथे लढणे क्रमप्राप्त आहे. राहिला प्रश्न विश्वासाचा, तर काल सकाळपासून मला फोन घ्यायला उशीर झाला, तेव्हा प्रसारमाध्यमे ज्या पद्धतीने सातत्याने कॉल करत होती, त्यावरून माझ्या लक्षात आलं की परिस्थिती खूप अवघड झाली आहे. म्हणून मी तातडीने सर्वांना भेटायला आले. शेवटी ज्याची त्याची नियत आणि काम करण्याची पद्धती असते. सचिन भाऊंनी दानवे यांना जो मेसेज टाकला होता,ज्यामध्ये ते म्हणतात की ‘ नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड, हाऊ कॅन आय सर्व्हायव्ह?, कदाचित त्यांना वरळी मतदारसंघ आता राहिला नाही पुढच्या काळात मतदारसंघही नाही आणि पुरेसे संख्याबळ विधान परिषदेत नाही, यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता सतावत असेल. पण माझ्यासमोर या पक्षात येतानाच ‘ समोर काहीच नाही’ हे पक्के माहित होते, ते माहित असतानाही मी या पक्षात आलेली आहे.”


शेवटी, मूळ शिवसैनिकांना डावलले जात असल्याच्या मुद्यावर अंधारे म्हणाल्या “ मूळ शिवसैनिकांना संधी नक्कीच दिली पाहिजे. अगदी वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा स्टेजवर मूळ शिवसैनिकांचा वावर असला पाहिजे, हे तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. कारण एका वर्धान दिनाच्या वेळी स्टेजवर कोणीतरी होते, एका वर्धापन दिनाला टीएमसीचे खासदार साकेत गोखले होते, तर आता अजून कोणीतरी होतं. या सगळ्यामुळे, नाही म्हटलं तरी कार्यकर्त्यांच्या मनात एक खदखद असते की, आपल्याकडे एवढे सगळे निष्ठावान लोक असताना आपण बाहेरच्या लोकांना बोलावून त्यांना मंचावर स्थान का देतोय? असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे.

Comments


bottom of page