top of page

नाशिकमध्ये मुसळधार, गोदावरीचे पाणी शहरात घुसायला सुरुवात; दुतोंड्या मारुती पाण्यात

नाशिक : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.यासोबतच नाशिकला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरणाचे दरवाजे उघडले आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नाशिक शहरात आता पाणी घुसण्यात सुरूवात झाली आहे. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पाण्यात बुडाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणातून 9 हजार 848 क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात प्रचंड पाणी बघायला मिळत आहे. या परिसरातील दुतोंड्या मारुती कालपर्यंत पूर्ण दिसत होता. तसेच सकाळी त्याच्या छातीपर्यंत पाणी आलेलं होतं. पण आता दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. दुतोंड्या तारुती हा पुराचा मापदंड समजला जातो. नाशिक आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. गोदावरी नदीने आता रौद्र रुप धारण केलेलं बघायला मिळालं आहे. पाऊस थांबला नाही तर गोदावरीला महापूर येण्याची भीती आहे. या परिस्थितीत सर्वसामान्यांची काळजी घेणं, त्यांची सुरक्षितस्थळी रवानगी करणं हे प्रशासनापुढे आव्हान असणार आहे.


दरम्यान, रामकुंड परिसरातील काही मंदिरं गोदावरी नदीत बुडाली आहेत. पुराचं पाणी शहरातच घुसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठी असणारी सर्व दुकानं खाली करण्यास सुरुवात झाली आहे. व्यापारी आपापल्या दुकानातील सामान घेऊन दुसरीकडे जात आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता व्यापार्‍यांनी हे पाऊल उचललं आहे. दुकानांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. कपालेश्वर मंदीर ते संत गाडगेबाबा पुलाकडे जाणारा मार्ग हा नेहमीच रहदारीचा असतो, पण आज या ठिकाणी रस्त्याला नदीचं स्वरुप आलेलं आहे. यावेळी परिसरातील काही लहान मुलं हे टायर ट्युबचा वापर करत पोहण्याचा आनंद लुटताना बघायला मिळत आहे. पण पाऊस वाढला तर नदीकाठच्या नागरिकांसाठी धोका उद्भवू शकतो. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आधीच दिला आहे.

Comments


bottom of page