top of page

शिवसेना पक्ष कोणाचा?: अर्ज देणं बंद करा, ऑगस्टमध्ये सोक्षमोक्ष लावणार - सुप्रीम कोर्ट



शिवसेना फूटीनंतर पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात या खटल्याच्या सोमवारी सुनावणीवेळी खंडपीठाने महत्वाच्या सूचना दिल्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षापासून प्रलंबित आहे. आता या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.


यावेळी शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याप्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूर्तींनी माझे व——ेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय राखून ठेवू शकते. परंतु, निवडणुक संपल्यानंतर म्हणजे 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.


ही ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत या प्रकरणाला दोन वर्षे झाली असून आता या खटलचा सोक्षमोक्ष लावायचा, असे संकेत दिले. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार का परत उद्धव ठाकरे यांना मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


आगामी महानगरपालिका, जिल्हापरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ही सुनावणी ऑगस्टमध्ये होऊन निकाल यावा, हा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल. शिंदे गटाच्या वतिने म्हणणं होतं की, हे दोन वर्ष झोपा काढत होते, त्यांनी काहीच केलं नाही. सुप्रीम कोर्ट म्हणालं, तरी जे काय सगळं असेल दोन वर्षे झालेले आहेत, आणि आता आम्हाला याचा सोक्षमोक्ष करावा लागेल, कधी ना कधी ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसात देऊ आणि अशी तारीख देऊन ज्या तारखेला हे प्रकरण ऐकलं जाईल. आता प्रकरण ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस याच्यावर युक्तीवाद होतील त्याच्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल, अशी शक्यता आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाला दिलासा मिळाला तशा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचाही गट आशावादी होणार यात शंका नाही. दरम्यान शिवसेना फूटीनंतर काही महिन्यातच राष्ट्रवादीतही फूट पडली होती. ठाकरे गटा प्रमाणेच शरद पवार गटाचाही पक्ष आणि चिन्हावर गडांतर आलं होतं. पण आता सर्वोच्च न्यायालयाने सुणावनी दरम्यानच्या टिप्पनीमुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असून काही प्रमाणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

Comments


bottom of page