मती गुंगवून टाकणारा 'महाघोटाळा'
- Navnath Yewale
- Jun 7
- 5 min read

ही माहिती तुमच्या पर्यंत पोहोचली का? भारतातलाच नव्हे तर जगातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक महाघोटाळा! सर्वसामान्य माणसांचे हजारो कोटी रुपये गिळंकृत करणारा मती गुंगवून टाकणारा अजस्त्र नि संतापजनक स्कॅम असे याचे वर्णन करता येईल!
एलआयसी मध्ये सामान्य माणसांचा पैसा गुंतला आहे. त्यामुळे तिथले पैसे अन्यत्र गुंतवताना तारतम्याने आणि काळजीपूर्वक गुंतवले जाणे अपेक्षित आहे मात्र फ्रॉड कंपनीत गुंतवणूक केल्याने काल एका दिवसांत एलआयसीने 1600 कोटी गमावलेत. एका व्यक्तीने जवळपास साडेपंधरा लाख कोटी रुपयांचे फेक फिगर्स दाखवून घोटाळा केला आहे. हा घोटाळेबाजही गुजराती निघालाय, ह्याचे नाव आहे राजेश मेहता! ह्या घोटाळेबाजाच्या कंपनीच्या एकूण भांडवलात एलआयसीचे भांडवल आहे तब्बल 10 टक्के! एलआयसीने ह्या कंपनीत 2000 कोटींहून अधिक गुंतवणूक केलीय.
कंपनीच्या एका सजग शेअरहोल्डरने कळवले की, सर्व आकडे फुगवून दाखवले जात असावेत कारण एक टक्का देखील फिजिकल आयडेंटीटी नाहीय आणि इतक्या मोठ्या स्तरावरील कंपनीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर असायला हवे ते तर बिलकुल नाहीय. ह्या ईमेलने सेबीला जाग आली. पुढे जाऊन सेबीच्या चौकशीतून, जगातला सर्वात मोठा स्कॅम ठरेल असा हा अजस्त्र घोटाळा उघडकीस आला.
कंपनीने दाखवलेली आकडेवारी तब्बल 99.80 टक्के खोटी आहे, गत तीन वर्षात त्यांच्या शेअरची किंमत ऐंशी टक्क्यांनी घसरलीय. एलआयसीने ह्यात 2000 कोटी गुंतवले आहेत म्हणजे ह्याच घसरणीचा दर त्या गुंतवणुकीस लावल्यास 2000 कोटी पैकी 80 टक्के म्हणजे 1600 कोटी रुपये बुडाले आहेत. हा पैसा सर्वसामान्य माणसांचा होता. विश्वास ठेवा किंवा न ठेवता तसेच मरा, पण आपल्या देशातील भ्रष्टाचार जवळपास सर्वोच्च पातळीवर आहे हे कटूसत्य आहे.
'राजेश एक्सपोर्ट्स' ही खरे तर सोन्याची आभूषणे बनवणारी छोटीशी कंपनी होती. कंपनीचा चेअरमन राजेश मेहतावर तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचा महसूल (रेव्हेन्यू) फुगवल्याचा गंभीर आरोप 'सेबी'ने केला आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर हा भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा अकाउंटिंग घोटाळा ठरू शकतो.
20 जून 1964 रोजी बंगळुरू येथे एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबात जन्मलेल्या राजेश मेहताचे मूळ कुटुंब गुजरातच्या मोरबी येथील होते, जे 1946 मध्ये बंगळुरूमध्ये स्थायिक झालं. त्याचे वडील जसवंतराय मेहता हे एका खाजगी कंपनीत काम करायचे आणि नंतर त्यांनी 'राजेश डायमंड कंपनी' नावाने रत्नांचा छोटा व्यापार सुरू केला.
राजेशचे शालेय शिक्षण बंगळुरूच्या 'सेंट जोसेफ स्कूल' मधून झालंय. लहानपणी डॉक्टर व्हायची स्वप्ने पाहणाऱ्या राजेशने उच्च शिक्षण घेण्याऐवजी कमी वयातच कौटुंबिक व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. 80 च्या दशकात भारतातील दागिन्यांचा व्यवसाय हा असंघटित होता. राजेश मेहता आणि त्यांचे भाऊ प्रशांत मेहता यांनी बँकेत काम करणरा आपला मोठा भाऊ बिपिन याच्याकडून फक्त 1200 रुपयांचे कर्ज घेतले आणि चांदीच्या दागिन्यांचा व्यापार सुरू केला. त्या काळात बँका सोन्या-चांदीच्या व्यापाराला किंवा असंघटित क्षेत्रातील नवख्या व्यवसायिकांना सहज कर्ज देत नसत. त्यामुळे राजेशला घरगुती कर्जावरच अवलंबून राहावे लागले होते. तो चेन्नईमधून चांदीचे दागिने खरेदी करायचा आणि राजकोटमधील आपल्या नातेवाईकांना व व्यापाऱ्यांना विकायचा. यातून मिळणाऱ्या छोट्या नफ्यातूनच त्याने हळूहळू आपले व्यावसायिक भांडवल वाढवले.
चांदीच्या व्यवसायात काही पैसे जमवल्यानंतर, 1989 मध्ये त्याने सोन्याच्या दागिन्यांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे मोठे कार्यालय किंवा कारखाना नव्हता. त्याने बंगळुरूमधील आपल्या घराच्या छोट्या गॅरेजमध्ये अवघ्या 10 कामगारांना सोबत घेऊन 'राजेश एक्सपोर्ट्स'ची पायाभरणी केली होती.
ह्या कथित कंपनीने अल्पावधीतच मोठी प्रगती केली.1995 मध्ये त्याने आपली कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध केली (IPO आणला) आणि बाजारातून 10 कोटी रुपये उभे केले. त्याने ताब्यात घेतलेला हा पहिला पब्लिक मनी होता! त्याने संपूर्ण कर्नाटकात 'शुभ ज्वेलर्स' ह्या नावाने स्वतःचे रिटेल आऊटलेट्स सुरू केली.
2015 मध्ये राजेश मेहताने जगाला चकित करणारा निर्णय घेतला. ही झेप त्याने 2015 साली घेतली होती, ही नोंद महत्वाची आहे, ह्याकामी त्याला कुणी मदत केली असेल याचे अंदाज तुम्ही ह्यावरून बांधू शकता! त्याने स्वित्झर्लंडमधली तेव्हाची जगातली सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी 'वाल्कॅम्बी' (Valcambi SA) तब्बल 400 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 2560 कोटी रुपये, रोख देऊन विकत घेतली. या व्यवहारामुळे 'राजेश एक्सपोर्ट्स' ही जगातील 35 टक्के सोन्यावर प्रक्रिया करणारी सर्वात मोठी कंपनी बनली, मात्र सोन्यावरची प्रक्रिया हा एक 'भूलभुलैया' होता. ती गोष्ट केवळ कागदोपत्रीच होती!
2017 मध्ये फोर्ब्सच्या यादीनुसार राजेश मेहताची एकूण संपत्ती 2.6 अब्ज डॉलर्स होती आणि तो भारतातील 61वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता. त्याला बंगळुरूमधील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक मानले जात असे. खोट्या फुगवलेल्या आकडेवारीमुळे त्याची कंपनी 'राजेश एक्सपोर्ट्स' फॉर्च्यून ग्लोबल फाईव हंड्रेड (Fortune Global 500) यादीत समाविष्ट होणारी भारतातील मोजक्या खाजगी कंपन्यांपैकी एक होती.
कंपनीच्या खात्यातून कोट्यवधी रुपये राजेश मेहताच्या स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवण्यात आले. त्यानंतर या पैशांमधून त्यांनी वैयक्तिकरित्या सोन्याचे डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग केले. खासगी ट्रेडिंगमध्ये मेहताला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला. तोटा लपवण्यासाठी, त्याने आपल्या वैयक्तिक व्यवहारांचे आकडे कंपनीच्या अधिकृत पुस्तकात हजारो पटींनी जास्त दाखवून बनावट विक्री-खरेदीचे व्यवहार नोंदवले.
राजेश एक्सपोर्ट्स आपल्या परदेशी उपकंपन्यांमधून (विशेषतः स्वित्झर्लंडमधील वाल्कॅम्बी - Valcambi SA) 99% महसूल येत असल्याचे भासवत होती. परंतु, जेव्हा या स्विस कंपनीची कागदपत्रे तपासली गेली तेव्हा असे लक्षात आले ह्या उपकंपनीने मेहता यांना असा कोणताही महसूल दिलेला नव्हता! ही माहिती सेबीच्या पायाखालची जमीन हादरवणारी ठरली. ह्या कंपनीची वास्तविक कमाई राजेश एक्सपोर्ट्सने दाखवलेल्या उत्पन्नाच्या 0.5 % पेक्षाही कमी निघाली.
मेहताच्या कंपनीने आफ्रिकेतील एका सुवर्ण खाणीत केलेल्या 1035 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे पुरावे देण्यात तो अपयशी ठरलाय. याशिवाय कॅनरा बँकेच्या 509 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकेने त्यांची खाती स्ट्रेस्ड ऍसेट्स म्हणून घोषित केली आहेत.
राजेश मेहताच्या कंपनीने रिफायनरीसाठी सोन्याची जी खरेदी विक्री केली त्याची आकडेवारी रिफायनरीचा महसुल म्हणून दाखवला, प्रत्यक्षात त्याने किती वजनाचे सोने शुद्धीकरण केले त्यातून मिळालेला नफा हे त्याचे उत्पन्न दाखवायला हवे होते त्याऐवजी त्याने किती टन सोने घेतले आणि ते परत विकले याची खरेदी विक्रीची आकडेवारी महसूल म्हणून दाखवली आणि उत्पन्नाचा आकडा सोळा लाख कोटीपर्यंत फुगवत नेला.
राजेश मेहताचे बिंग ईमेलने फुटण्याआधी त्याची आणखी एक गोष्ट संशयास्पद वाटली होती आणि ह्याच गोष्टीमुळे तो संशयाच्या भोवऱ्यात गुंतत गेला. कंपनीच्या अधिकृत वार्षिक अहवालानुसार जगभरात हजारो कोटी रुपयांचे सोने विकणाऱ्या या कंपनीत केवळ सव्वाशेच्या दरम्यान स्थायी कर्मचारी काम करत असल्याचे दाखवण्यात आले होते. कंपनीच्या खात्यानुसार, या मोजक्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि पगारासाठी कंपनीने 215 कोटी रुपये खर्च केल्याचे दाखवले होते. याचा साधा अर्थ असा होतो की, कंपनीमधील प्रत्येक सामान्य कर्मचाऱ्याचा सरासरी पगार वार्षिक सव्वा ते दीड कोटी रुपये इतका मोठा होता. भारतीय ज्वेलरी उद्योगाच्या मानकानुसार हा पगार अशक्य आणि संशयास्पद मानला गेला आणि राजेशची कंपनी खऱ्या अर्थाने रडारवर आली.
ज्या कंपनीचा महसूल लाखो कोटी रुपयांमध्ये आहे, ती कंपनी केवळ शंभर कर्मचाऱ्यांच्या बळावर कशी काय चालू शकते ह्या प्रश्नाने तपासकर्ते चक्रावून गेले. ह्यामुळेच ही कंपनी केवळ कागदावर 'बोगस व्यवहार' (Circular Trading) दाखवून महसूल फुगवत असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली. आणि आता तर सारेच ठप्प पडलेय.
थोडक्यात सांगायचे तर, एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील या तरुणाने अवघ्या 1200 रुपयांच्या भांडवलावरून अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते. असा रोमांचक इतिहास त्याच्या यशाचे 'रोलमॉडेल' म्हणून अनेक वर्षे सांगितला जात होता, ज्याचे पितळ आता उघडे पडले आहे.
देशात मोठे आर्थिक घोटाळे प्रामुख्याने गुजराती मंडळींनी केले आहेत आणि सद्यघडीला देशाबाहेरही मनमर्जीने वागून आपल्या देशाचे नाव खराब करण्यात गुजराती मंडळी आघाडीवर आहेत, दोन गुजराती माणसं देशाचे सुकाणू हाकत असताना ही गोष्ट अधिक ठळक व्हावी हे गुजरातसाठी नक्कीच अशोभनीय आहे! असो!
ज्या बँका शेतकऱ्याला हजार रुपडे देण्यासाठी रडवतात त्या डोळे झाकून हजारो कोटी रुपयांची माती होऊ देतात तेव्हा त्या कशा काय मौन राहतात? जी एलआयसी एखाद्या गरीब पॉलिसीधारकाने दोन पाचशे रुपयांचा प्रीमियम मुदतीत भरला नाही तर त्याला लगेच पेनल्टी लावते त्या एलआयसीला 2000 कोटी रुपये हे अस्से उधळून देताना लाज शरम कशी काय वाटत नसेल? सामान्य भारतीयांच्या पैशांवरचा हा ढळढळीत दरोडा आहे! याचे उत्तरदायित्व कोण घेणार आहे? की नेहमीप्रमाणे याचीही लिपापोती केली जाईल? आज रात्री दूरदर्शनवर सुधीर चौधरी सामान्य जनतेचे पैसे बुडाल्याचे दहा फायदे समजावून सांगण्याचा कार्यक्रम घेईल का असाही प्रश्न पडतो! तुम्हाला काही प्रश्न पडतात की नाही?
आपण ह्यावर प्रश्न उपस्थित करू की नाही हे सांगता येणार नाही, मात्र वीसेक वर्षांनी नेटफ्लिक्सवरती ह्या स्कॅमवर आधारलेली वेबसिरीज आली की तिचे दोन तीन सिझन आपण एन्जॉय नक्की करू! असो!
लेखक
-समीर गायकवाड



Comments