top of page

इराण-इस्त्रायल युद्ध ; दहा हजार भारतीयांचे जीव धोक्यात


इराण आणि इस्त्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रलालयाने आपल्या लोकांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वाचवण्यात येणार्‍या लोकांमध्ये भारतीय विद्यार्थी आणि कामावर गेलेले लोक आणि त्यांचे कुटुंब यांचा समावेश आहे. आता या सर्वांना सुरक्षित ठिकाणी पाठवले जात आहे. वाढत्या तणावमुळे, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने त्यावर काम सुरू केले आहे. आता परराष्ट्र मंत्रालयाने एक नवीन सल्लागार जारी केला आहे. ज्यामुळे परिस्थिती अधिक स्पष्ट झाली आहे. सध्या इराणमध्ये एकून 10 हजार भारतीय आहेत, ज्यांच्या सुरक्षितेबाबत चिंता वाढत आहे.


माहिती नुसार, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि दूतावासाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, तेहरानमध्ये उपस्थित असलेले सर्व भारतीय नागरिक, ते विद्यार्थी असोत, काम करणारे असोत, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा व्हिसा असो, त्यांनी आज संध्याकाळपर्यंत इराणची राजधानी तेहरान सोडवे.


इस्त्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात 10 हजार भारतीय अडकले आहेत. त्यापैकी 1500 विद्यार्थी आहेत आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची तयारी देखील सुरू झाली आहे. भारत सरकारने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, इराणमध्ये उपस्थित असलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी पाठवले जात आहे आणि इतर संभाव्य पर्यायांवरही काम केले जात आहे. त्याच वेळी, इराण सरकारने भारताला सांगितले की, यद्धादरम्यान सर्व विमानतळ बंद आहेत. परंतु जमिनीवरील सीमेवरून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे शक्य आहे. कारण ते खुले आहेत.


सुरक्षित बाहेर पडण्यासाठी इराणने इराणमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीयांची माहिती मागितली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना घरातच राहण्यास सांगितले आहे. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, दूतावासाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, “ तेहारानमधील भारतीय दूतावास सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी संपर्क साधत आहे.


युद्धादरम्यान भारतीय दूतावासाने इराण आणि इस्त्रायलमध्ये राहणार्‍या भारतीयांसाठी सूचना जारी केल्या आहेत. भारतीय दूतावासाने लोकांना अनावश्यक प्रवास किंवा हालचाल टाळण्याचे आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. यासाठी 24/7 हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. इस्त्रायलमधील भारतीय दूतावासाने रविवारी सांगितले की, सर्व भारतीय सुरक्षित आहेत. भारतीय दूतावास या प्रदेशातील परिस्थिती आणि त्यांच्या नगारिकांच्या सुरक्षिततेवर सतत लक्ष ठेवून आहे . दोन्ही देशांमध्ये राहणार्‍या भारतीयांना घाबरू नका, सावधगिरी बाळगा आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


सध्या 1500 हून अधकि भारतीय विद्यार्थी इराणमध्ये आहेत. इराणमधील तेहरानमधील भारतीय दूतावासाने तेथे आडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना हलविण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे. दूतावासाने म्हटले आहे की, सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सकाळी 9:30 (स्थानिक वेळेनुसार) वेलेंजाक विद्यापीठाच्या गेट क्रमांक 2 वर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. बसेस सकाळी 10:00 वाजता कोम शहरासाठी रवाना होतील.



हा आदेश शाहिद बेहेश्ती मेडिकल सायन्सेस विद्यापीठातील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना लागू आहे. ज्यामध्ये वसतिगृहे आणि खासगी अपार्टमेंटमध्ये राहणारे विद्यार्थी देखील समाविष्ट आहेत. कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याने मुलांच्या किंवा मुलींच्या वसतिगृहात किंवा खासगी आपार्टमेंटमध्ये राहू नये. त्यांना हा संदेश व्यापकपणे प्रसारित केला जाईल आणि कोणताही अपवाद न करता त्याचे पालन केले जाईल, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.

Comments


bottom of page