top of page

महाराष्ट्रभर ड्रग्ज विकतायत, इराणने आपल्याला साथ दिली केंद्राने मोठी चूक केली - राज ठाकरे

मुंबई: मनेसेचा गुढीपाडावा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघात केला. राज ठाकरे यांनी यावेळी राज्यातील अनेक सामाजीक प्रश्न उपस्थित केले. राज्यातील तरुण-तरुणी ड्रग्जच्या आहारी गेल्याचे म्हणत सध्या सुरू असलेल्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धावरही राज ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.


राज ठाकरे म्हणाले की, गेल्या काही वर्षामध्ये राज्यावरील कर्जात मोठी वाढ झाली आहे. 2014 पूर्वी राज्यावर 2 लाख कोटी कर्ज होते. मात्र त्यानंतर आतापर्यंत 11 लाख कोटी कर्ज झाले आहे. असं असलं तरी शहरे कोलमडून पडली आहेत. पिज्जा 10 मिनिटात येतो, पण सामान्य मानसाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही फुटपाथ जाम आहेत, सगळीकडे ट्रॉफिक आहे. ग्रामीण भागातील लोक शहराकडे येऊ इच्छित आहेत. मात्र शहराचे नियोजन नाही.


पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे , मात्र संपूर्ण राज्यात ड्रग्ज विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्ज जातायेत, तरुण-तरुणी व्यसनाधीन होत आहेत. काय करणार आहोत आपण महाराष्ट्राचं. ग्रामीण भागात प्रगती होत नाही, ग्रामीण भागातील मुलं-मुली शहरात येत आहेत, शहरं बकाल पडली आहेत. शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत. लहान मुली-मुलं पळवली जात आहेत.


यावेळी त्यांनी लहान मुलं गायब होण्याची आकडेवारीच सादर केली. ते म्हणाले की, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये 36 दिवसांतमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली आहेत. त्याआधी जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या काळात नवी मुंबईत 499 मुलं बेपत्ता झाली हाती, महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मुले पालकांना मिळाली, मात्र त्यातील 41 मुलं बेपत्ता आहेत. एनसीआरबी च्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी 4500ते5000 मुलं बेपत्ता होतात. 2022 मध्ये 5398 आणि 2023 मध्ये 4619 मुले बेपत्ता झाली आहेत. यात मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत दरवर्षी 2000 पेक्षा जास्त होतात अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.

शरद पवारांचे कौतुक : आपल्या भाषणात बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला. शरद पवार यांनी आतापर्यंत अनेक कामं केली आहेत. आमचे अनेक मतभेद असतील. पण ज्या गोष्टी योग्य आहेत, त्या योग्यच आहेत असे सांगितले पाहिजे. आता तुम्ही रस्त्यावर विकण्यासाठी ठेवलेली फळं पाहतो. पूर्वी दिसत नव्हते. आपण गाडी थांबवली की कोणतरी फळं विकायला घेऊन येतो. शरद पवार यांनी महाराष्ट्रात फलोत्पादनात सर्वात मोठी क्रांती केली. जी फळं पाहिली नव्हती ती आज सर्वसामान्यांना मिळायला लागली. बारामती त्यांनी एआय टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये क्रांती केली. बारामतीमध्ये जाऊन जे पाहिले आहे, असे राज ठाकरे म्हणाले.


केंद्र सरकारने मोठी चूक केली: “सध्या सगळीकडे धाकधूक आहे, भीषण परिस्थिती आहे. अन्न शिजवायला गॅस मिळत नाही. खरं तर काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राहून गेल्या. इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत हाता. त्या इराणवरती जे हल्ले होत आहेत, त्यामध्ये आपण इराणला साथ द्यायला हवी होती. या देशामध्ये येणारं बरचसं तेल इराणहून येतं. ते आपल्याला तेल रुपयात देतात. खामेनेई गेल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांनी कुठलेही निषेधाचे एकही निवेदन काढले नाही. हल्ल्यावरही कुठले निवेदन दिले नाही असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.


तसेच हा देश जम्मू काश्मिरच्या प्रश्नावर नेहमी आपल्या पाठीशी उभा राहिला, त्या देशाच्या पाठीमागे आपण राहिलो नाहीत. याचा आपल्याला भविष्यात निश्चितच त्रास होणार. आपण नेमके कुठे जात आहोत, हेच समजायला वाव नाही, असा हल्लाबोलही राज ठाकरे यांनी केला.

Comments


bottom of page