top of page

वरळीतील शोकसभेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा केंद्रीय मंत्री नितिन गडकी, मुख्यमंत्री फडणवीस, राज्यपाल आचार्य देवव्रत भावूक

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएससीआय डोम. वरळी, मुंबई येथे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री  सुशिलकुमार शिंदे, उद्योजक गौतम अदानी, मुकेश अंबानी, अभिनेते नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.

 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी तीन दशकांहून अधिक काळ केलेले कार्य राज्याच्या सर्वच क्षेत्रांत आजही प्रकर्षाने जाणवते, त्‍यांच्या सहज, सरळ आणि सर्वांना  आपलेसे  करून  घेणाऱ्या स्वभावाचा विशेष उल्लेख करुन त्यांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठेवा ठरेल आणि समाजजीवनाला दिशा देणारे ठरेल, असे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यावेळी सांगितले.

 

महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले योगदान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. दिवंगत अजित पवार हेच महाराष्ट्राचे खरे 'रिअल स्टार' आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

 

अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाची गती कमी होऊ दिली नाही, यासाठी विकासकामांच्या दर्जात तडजोड केली नाही. आपली मते परखडपणे मांडताना, विकासासाठी  मंत्रिमंडळ  बैठकीत काटकसर  धोरणांचा पाठपुरावा  देखील करायचे  आणि विकास प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी निधीची तरतूद करताना अभ्यास पूर्ण माहिती सादर करीत. लाडकी बहीण  योजनेसाठी  तरतूद करताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा आणि विकासाचा ताळमेळ साधण्याचं अवघड काम त्यांनी केले, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

विकास दृष्टी असलेल्या नेत्याला आपण गमावले आहे. नुकतेच पुण्यासाठी काही तरी करा म्हणून त्यांचा पाठपुरावा सुरू होता, यातून केंद्र सरकार कडून या तीन मजली उन्नत पुल मंजूर केला होता. फक्त प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा न करता प्रत्यक्ष विकास प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देऊन जबाबदारीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रगतीचा आढावा घेताना त्यांना पाहिले आहे, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

Comments


bottom of page