top of page

दिल्लीला जाणारं विमान कोसळलं, उड्डाण घेताच संपर्क तुटला... रांची विमानतळावरुन केलं होतं उड्डाण

रांची: झारखंडमधून मोठी बातमी समोर येत आहे. रांची येथे एक मोठा विमान अपघात झाला आहे. टेकऑफनंतर काही वेळातच एका एअर अ‍ॅम्ब्यूलन्सचा अपघात झाला. हे विमान दिल्लीला जाण्यासाठी निघाले होेते. मात्र उड्डाण केल्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हे विमान कोसळलं. ही एअर अ‍ॅम्ब्यूलन्स एका रुग्णाला दिल्लीला घेऊन जात होती. चतरा आणि सिमरियाच्या सीमेवर विमान कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या विमानात एकूण 7 जण प्रवास करत होते अशीही माहिती समोर आली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, रांची आणि परिसरात पाऊस पडत आहे. त्यामुळे हे विमान कोसळले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या विमानात रुग्णाव्यतिरिक्त एक डॉक्टर, एक पॅरामेडिक, दोन अटेंडंट, एक पायलट-इन-कमांड आणि एक सह-पायलट असे 7 जण होते. चतरा जिल्ह्यातील सिमरिया पोलिस स्टेशन परिसरातील कासारी पंचायतमधील पथलपानिया येथे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जीवीत हानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


दरम्यान, रांची विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने सोमवारी (दि.23) रांचीहून सायंकाळी 7:11 वाजता उड्डाण केले. त्यानंतर विमानाशी अखेरचा संपर्क 7:34 च्या दरम्यान झाला. त्यानंतर कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यांनतर हे विमान कोसळले आहे. विमानतळ संचालकांनी या अपघाताची पुष्टी केली आहे. आता स्थानिक प्रशासन आणि पोलिस पथके सध्या जंगलात बचाव कार्यात गुंतलेली आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


विमानाचे शेवटेचे स्थान लातेहार आणि पलामू दरम्याच्या घनदाट जंगली आणि डोंगराळ भागात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या भागातील हवामान अचानक बिघडले असल्याची माहिती आहे. मुसळधार आणि जोरदार वारे होते. कमी दृश्यमानता किंवा तांत्रिक बिघाडामुळे विमान भरकटले असावे किंवा कोसळले असावे असा संशय आहे.

Comments


bottom of page