top of page

सोलापूरच्या तांदुळवाडी दुर्घटनेत विहीरीत उडी घेवून 6 जणांचे प्राण वाचवणारा इरफान ठरला माणुसकीचा खरा हिरो

सोलापूर: म्हसवड (जि. सातारा) येथील श्री सिद्धनाथांचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांच्या वाहनाला तांदुळवाडीजवळ भीषण अपघात झाला. भाविकांचे पिकअप वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, काळजाला पिळवटून टाकणार्‍या प्रसंगात तांदूळवाडी येथील तरुण इरफान मुजावर आणि त्याच्या सहकार्‍यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावत 6 जणांचे प्राण वाचवले. संकटसमयी दाखवलेल्या या अचाट धैर्यामुळे इरफान सध्या माणुसकीचा खरा हिरो ठरला आहे.


सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवडवरुन दर्शन घेन पिकअप वाहनाने परतत होते. तांदूळवाडीजवळ आले असता नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट रस्त्याशेजारील विहिरीत कोसळले. याच वेळी अपघातग्रस्त वाहनाच्या पाठीमागून दुचाकीवरून पेट्रोल पंपाकडे जात असलेल्या इरफान मुजावर याने हा अपघात डोळ्यांसमोर पाहिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या मित्रांना फोन करून तातडीने घटनास्थळी बोलावले. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता इरफानने थेट विहीरीत उडी घेतली आणि बचावकार्य सुरू केले.


विहीरीत पाणी, अंधार आणि गाळ अशा भीषण परिस्थितीतचा सामना करत विहिरीत अडकलेल्या महिला, पुरुष आणि चिमुकल्यांचे आक्रोश ऐकून इरफान आणि त्याच्या सहकार्‍यांचे ह्रदय हेलावले. त्यांनी जीवाची पर्वा न करता एकामागून एक करत 6 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. दुर्दैवाने, वाहनाच्या आत अडकलेल्या काही प्रवाशांना वाचवण्यात यश आले नाही, परंतु या तरुणांच्या धाडसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.


अपघात घडल्यानंतर घटनास्थळी 100 पेक्षा जास्त लोक जमा झाले होते. मात्र काही जण मदतीला पुढे येण्याऐवजी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात मग्न होते. नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की, अपघात असो वा कोणतीही दुर्घटना, तिथे व्हिडिओ न काढता पहिल्यांदा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी समोर या असे आवाहन इरफान मुजावर यांनी केले आहे.


या संपूर्ण बचावकार्यात इरफान मुजावर याच्या सोबतीने स्वप्नील कदम, किरण दुधाट, तुकाराम कर्णवर, धायगुडे, दादा माने, हेगडे ड्रायव्हर, हणमंत रणदिवे, सौरभ कोळी, महादेव कदम, धनाजी तानाजी कदम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोलाची भूमिका बजावली. विहीरीतून बाहेर काढलेल्या जखमींवर तातडीने उपचार करून त्यांना जीवदान देणारे डॉ. राहुल मिले यांचेही सर्व कौतुक होत आहे.


संकटाच्या अत्यंत कठीण क्षणी जात, धर्म,पंथ या सर्व भींती बाजूला सारून केवळ माणुसकीच्या नात्याने मदतीला धावून जाणार्‍या इरफान मुजावर आणि त्याच्या मित्रांनी समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. आज संपूर्ण तांदळवाडी गावाला या तरुणांच्या शौर्याचा सार्थ अभिमान वाटत आहे.

Comments


bottom of page