ओबीसी नेते आक्रमक, थेट दिल्लीत आंदोलनाचा इशारा

नागपूर : जातियनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाज दिल्लीकडे जाणार आहे. आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी आज विदर्भस्तरीय ओबीसी नेते पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी एक नोव्हेंबरला ‘ चलो दिल्ली’ चा नारा देण्यात आला.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींची स्वतंत्र कॉलमसह जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे,ही मागणी आहे. सरकारने जनगणनेच्या प्रक्रियेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आली नाही, तर त्यांच्या प्रतिनिधीत्वाचा आणि आरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे स्वतंत्र कॉलमसह जातिनिहाय जनगणना होणे अत्यावश्यक आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
13 सप्टेंबर रोजी दिल्लीत सुमारे 65 ओबीसी संघटनांची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयांच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू झाली. दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त तालुका स्तरावर सत्याग्रह,25 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदेालन व मोर्चे आणि त्यानंतर एक नोव्हेंबर रोजी ‘ चलो दिल्ली’ चा नारा देत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने यापूर्वीच्या आंदोलनामध्ये आश्वासने आणि कागदपत्रांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आता जरांगे यांनी मांडलेल्या मागण्यांवर सरकारनेे घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास होईल असंही वडेट्टीवार म्हणाले.



Comments