जिल्हापरिषद निवडणुकांचे दिवाळी नंतर फटाके फुटणार!,राज्य निवडणूक अयोगाचा प्रारुप आरक्षण प्रोग्राम जाहिर
- Navnath Yewale
- Oct 1
- 1 min read

मुंबई: राज्यात प्रशासक राज असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामध्ये दिवाळीनंतर पदाधिकारी बसण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहिर करण्याबाबतचा कार्यक्रम आखून दिला आहे त्यामुळे दिवाळीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर शिक्का मोर्तब झालं आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी आज (दि. 1 ऑक्टोबर) जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला.
दरम्यान 30 ऑक्टोबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याबाबत राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्यांना कळवले आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील नोडल ऑफिसर यांनी प्रत्येक टप्यावरील कामकाजाबाबत आयोगास अहवाल सादर करावा असेही राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे.
आरक्षण कार्यक्रम : 6 ऑक्टोबर पर्यंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे सादर करणे, 8 ऑक्टोबर पर्यंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे, 10 ऑक्टोबर आरक्षण सोडतीची सुचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांबाबत)
13 ऑक्टोबर जिल्हा परिषद गटासाठी व पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत, 14 ते 17 ऑक्टोबर जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचात समितीमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी, 27 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त प्रारुप आरक्षणावरील हरकती व सुचना आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे, 3 नोव्हेंबर पर्यंत प्रारुप आरक्षणावर प्राप्त हरकती व सुचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करणे, 3 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


Comments