top of page

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक जमिन भूसंपादन घोटाळा; कोट्यावधींच्या भ्रष्टाराच्या आरोपाने प्रशासनात खळबळ

बीड: जिल्ह्यात भूसंपानामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत कोट्यावधींच्या घोटाळ्या प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी (दि.7) लातूर येथील राहत्या घरातून बीड पोलिसांनी अटक केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी थेट जिल्हाधिकार्‍यांनाच अटक झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.


बीड येथे जिल्हाधिकारीपदावर कार्यरत असताना अविनाश पाठक यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

भूसंपादनाच्या मोबदल्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. शासकीय कादपत्रांवरप बनावट स्वाक्षर्‍या करून शासनाची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले होते. या संदर्भात बीडमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करत आहेत.


दरम्यान, सबळ पुराव्याच्या आधारे बीड पोलिसांचे एक पथक आज (गुरुवार, दि.7) सकाळी लातूरमध्ये दाखल झाले. लातूर पोलिसांच्या मदतीने पाठक यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. अविनाश पाठक यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांना बीडला आणण्यात आले आहे. पुढील चौकशीत या घोटाळ्याचे आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments


bottom of page