मराठा आंदोलन; हायकोर्टाचे सरकारला निर्देश
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात अमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी कोर्टात आंदोलकांचे वकील, याचिकाकर्ते, राज्य सरकार आणि पोलिसांनी आपापला युक्तिवाद मांडला. दीड तासाहून अधिक काळ या आंदोलनावर सुनावणी झाली. त्यात आमरण उपोषणाला परवानगी दिली नव्हती असं कोर्टाने म्हटलं. त्याशिवाय पाच हजाराहून अधिक लोक आणू नये याची जबाबदारी आयोजकांची होती अशी निरीक्षणं नोंदवत कोर्टानं आंदोलनावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या सुनावणीवेळी आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये, पाच हजारापेक्षा जास्त आंदोलक नको असं हायकोर्टाने सांगितले. तर रस्ते अडवायला, गर्दी करायला जरांगे पाटील यांनी सांगितले नाही असं मनोज जरांगे पाटील यांचे वकील पिंगळे यांनी कोर्टात म्हटलं, मग रस्त्यावर फिरणार्यांना आवाहन करून तुम्ही मुंबईतून बाहेर घालवणार का? असा प्रश्न कोर्टाने वकिलांना केला. कोर्टासमोर डिप्लोमेटिक वागू नका असं न्यायाधीशांनी जरांगेच्या वकिलांना सुनावले. आझाद मैदानात पाच हजरांपेक्षा जास्त लोक नको, सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं काही कृत्य नको असे कोर्टाने जरांगे पाटील यांच्या वकीलांना सांगितले.
दक्षीण मुंबईतील रस्ते मोकळे करा
आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर आंदोलकांची गर्दी आहे. आझाद मैदान वगळता इतर कुठेही आंदोलक नको, त्याशिवाय दक्षिण मुंबईतील रस्ते उद्या दुपारी 4 पर्यंत रिकामे करा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय आणखी आंदोलक मुंबईत येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना मुंबईच्या बाहेर थांबवावे असे हायकोर्टाने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. आणखी आंदोलक आल्यास राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावीत असं कोर्टाने सांगितले आहे.
दरम्यान, जेवण आणि पाणी आणण्यास तात्पुरती परवानगी हायकोर्टाने दिली आहे. तर जेवणाचे ट्रक मुंबईत येण्यास परवानगी देऊ नका अशी मागणी सदवर्ते यांनी केली होती.जर असं केले तर इतर समाजालाही परवानगी द्यावी लागेल असं सदावर्ते म्हणाले, त्यावर हायकोर्टाने सगळ्यांनाच आंदोलनाचा अधिकार आहे असं सांगितले. कोर्टाने दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल. मुंबईतील रस्त्यांवर आंदोलन नको, आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार द्यावे असं हायकोर्टाने म्हटलं आहे. उद्या दुपारी 3:00 वाजता पुन्हा मराठा आंदोलनावर सुनावणी होणार आहे.
समाजकंटकांचा आंदोलनात शिरकाव
आंदोलनकर्त्यांनी कोर्टाच आदेशाचे पालन करावे असं वेळोवेळी मनोज जरांगे यांनी आवाहन केले होते. कोर्टाच्या अटींचे पालन आम्ही केले. परंतु 29 आणि 30 ऑगस्ट रेाजी भरपूर पाऊस होता, आझाद मैदानात चिखल झाला होता. मरठा समाजाने कुणाचा हक्क हिरावून घेतला नाही. वाईट गोष्टी सरकाने कोर्टासमोर दाखवल्या. हे आंदोलन सरकारविरोधी आहे. लोकांना त्रास देणारे नाही. काही समाजकंटक बेकायदेशीर कृत्य करत आहेत जेणेकरून आंदेालन भरकटेल . पाच हजारापेक्षा जास्त आंदोलक नको असं हायकोर्टाने सांगितले आहे. त्यावर आता मनोज जरांगे पाटील निर्णय घेतील असं जरांगे पाटील यांचे वकील श्री.पिंगळे म्हणाले.
Comments