top of page

मराठा ओबीसी आमन - सामने?; मनोज जरांगेचे 29 ऑगस्टला आंदोलन, लक्ष्मण हाकेंचा 1 सप्टेंबरला ‘चलो मुंबई’ नारा

बीड: कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मुद्यावरून पुन्हा 29 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे ओबीसींचं आरक्षण संपल्याचा आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरला मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापलेलं असतानाच आता मराठा- ओबीसी पुन्हा आमने- सामने येण्याची चिन्ह असल्याने सरकारची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे.


आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 29 ऑगस्ट आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत संवाद सभांच्या माध्यमातून सरकारवर निशाना साधला. त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एखादा ओबीसी मंत्री असेल तर त्याला टारगेट करणं योग्य नाही’ असा पलटवार करत सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं.


दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमचं आंदोलनच रिअ‍ॅक्सनचं आहे म्हणत जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू असतानाच सोलापूर, पंढरपुरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव चा नारा देत जरांगेच्या विरोधात एल्गार पुकाराला. मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांवर वैयक्तीक टीका करणार्‍या मनोज जरांगेचं ऐकून सरकारने ओबीसी आरक्षणाचं वाटोळं केलं आहे. आज ओबीसी आरक्षण संपलेलं आहे. जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करत असले, तर आम्ही ‘ओबीसी आरक्षण संपलं आहे, जर संपलं नसेल,तर ते कसं संपलं नाही हे आम्हाला सरकारने सांगावं’ याचा जाबा विचारण्यासाठी लाखोंच्या सहभागात 1 सप्टेंबर रोजी मुंबईकडे कुच करणार आहोत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. रविवारी (दि.16) बीड येथे स्व. विलास घुले यांच्या कुटुंबीयांच्या उपोषणाला भेट दिल्या नंतर हाके माध्यमांशी बोलत होते.

Comments


bottom of page