श्रद्धा, सुविधा आणि विकासाचा संगम - श्रीक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा ऐतिहासिक संकल्प!
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात बैठक पार पडली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीक्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, 'श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या'च्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार आहे. हा संपूर्ण विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार असून वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच स्थानिकांच्या हिताचे संरक्षण, पुनर्वसन आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले जाईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी सादर केलेल्या 'श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या'स राज्यस्तरीय शिखर समितीच्या मान्यतेनंतर 18 जून 2026 रोजी सरकारने ₹3993.90 कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा आराखडा पंढरपूरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी आराखड्यात वारकऱ्यांसाठी समग्र सोयीसुविधा विकसित करण्यासाठी ₹288.66 कोटी, पुरातन मंदिरे व मठांचे जतन आणि संवर्धनासाठी ₹36 कोटी तसेच मंदिर परिसरात भव्य कॉरिडोर उभारण्यासाठी ₹254.61 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कामांवर मिळून पंढरपूर कॉरिडोरसाठी ₹579.27 कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
याशिवाय नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, चंद्रभागा नदी घाटांचे सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ, व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, शहराला जोडणारे रस्ते व पूल आणि पालखी तळांचा विकास अशा विविध कामांसाठी एकूण ₹1387.91 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आराखड्यात बाधित नागरिकांच्या हितालाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. भूसंपादन, पुनर्वसन आणि बाधित इमारतींच्या मोबदल्यासाठी तब्बल ₹2026.72 कोटींची तरतूद करण्यात आली असून, विकासासोबत सामाजिक न्यायाचाही समतोल साधण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या मागणीनुसार भूसंपादनासाठी आवश्यक निधीपैकी त्वरित 30% निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सन 2026-27 च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे या आराखड्यासाठी ₹600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी नगर विकास विभागाकडे प्रस्तावही सादर केला आहे. त्यामुळे विकासकामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेला हा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासोबतच वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुविधायुक्त ठरेल. तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.



Comments