स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेच्या खात्यावर फडणवीस नाराज?
- Navnath Yewale
- 7 days ago
- 1 min read

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्याच्या सुमार कारभारावर ताशेरे ओढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे.
2021 मध्ये सुरू झालेल्या आमृत योजनेच्या दुसर्या टप्प्यातील कामं पूर्ण करण्यासाठी केंद्राने उपलब्ध 9 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिलं आहे. मात्र ही काम अजूनही पूर्ण झालेली नाहीत. 2026 मध्ये या कामांची मुदत संपणार आहे. त्यामुळे प्रलंबित कामं 31 मार्च 2026 आधी मिशन मोडवर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. तर ही कामं पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील परवानग्या तातडीने मिळवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकार्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नगरविकास खात्यावरील नाराजीवरून विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेना बडतर्फ करावं अशी थेट मागणी राऊतांनी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचाराला असता त्यांनी मूळ प्रश्नालाच बगल दिली आहे. महायुतीतील अंतर्गत कुरघोडीमुळेच एकनाथ शिंदेंनी या आधीही मंत्रिमंडळ बैठकांना दांडी मारल्याचं समोर आलं आहे.
3 फेब्रूवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीला रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा न सुटल्याने शिंदेंनी दांडी मारली. त्यानंतर 12 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले होते. तर 20 ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीलाही एकनाथ शिंदेंनी दांडी मारली आहे. एवढंच नाही तर खुद्द नगरविकास विभागाच्या अमृत योजनेच्या आढावा बैठकीलाही शिंदे गैरहजर होते.
याच अंतर्गत कुरघोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामधील नाराजी कधी दूर होणार? यावर महापालिका निवडणुकीतील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.
Comments