वर्षभर सोनं खरेदी करू नका, वर्कफ्रॉम होम करा; पेट्रोल-डिझेलचा वापर काटकसरीने करा- पंतप्रधान मोदी
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे भारतात पेट्रोल- डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच पीएम मोदी यांनी सर्व भारतीयांना महत्वाचे आवाहन केले आहे. वर्षभर सोनं-चांदी खरेदी करू नका आणि पेट्रोल- डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसंच, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटींग सुरू करा, असे देखील त्यांनी आवाहन केले. पीएम मोदींनी या आवाहानामागची कारण देखील सांगितली आहेत.
पीएम मोदी यांनी तेलंगणातील सिकंदराबाद येथे नागरिकांशी संवाद साधताना देशवासीयांना आवाहन केले. भारत मोठ्या प्रमाणात इंधनाची आयात करतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर योग्यपद्धतीने करणे महत्वाचे आहे. या जागतिक संकटाच्या काळात कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपण संकल्प केला पाहिजे आणि तो पूर्ण निष्ठेने पार पाडला पाहिजे. पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीने वापर करणे हा एक मोठा संकल्प आहे.
पीएम मोदी यांनी पेट्रोल-डिझेलची बचत करावी असे आवाहन करत सांगितले की, आपण पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे. मेट्रो असलेल्या शहरांमध्ये आपण फक्त मेट्रोनेच प्रवास करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. जर आपल्याला कार वापरायचीच असेल तर आपण कारपूलिंगचा प्रयत्न केला पाहिजे. इलेक्ट्रिक वाहने असलेल्या लोकांनी त्यांचा शक्य तितका वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनेक प्रणाली विकसित केल्या आणि आपल्याला त्यांची सवयही झाली. आज काळाची गरज अशी आहे की, जर आपण या प्रणाली पुन्हा सुरू केल्या तर ते राष्ट्रीय हिताचे ठरेल.
दरम्यान, पीएम मोदी यांनी वर्कफ्रॉम होम आणि ऑनलाइन मिटिंग पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करत सांगितले की, ‘आपण वर्कफ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फरन्स आणि व्हर्च्युअल मीटिंग्जला पुन्हा प्राधान्य दिले पाहिजे. आपण परकीय चलन वाचवण्यावरही जोरदार भर दिला पाहिज, कारण जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेल खूप महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. परदेशात लग्न करणे, परदेशात प्रवास करणे आणि परदेशात सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी जाणं ही संस्कृती मध्यमवर्गामध्ये प्रचलित होत आहे. पण आपण ठरवले पाहिजे की या संकटाच्यवा काळात आपण परदेश प्रवास किमान एक वर्षासाठी पुढे ढकलला पाहिजे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.



Comments