महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप?; एकनाथ शिंदे दिल्ली दौर्यावर, राज्यात हालचालींना वेग!
- Navnath Yewale
- Nov 19
- 2 min read

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा मोठा फटका हा त्यांचाच मित्र असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून आता नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक ठिकाणी स्वबळावर लढवल्या जात आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील मतदानाचं गणित बघुन युती आणि आघाडीचा निर्णय घेतला जात आहे.
दरम्यान, दुसरीकउे सर्वच पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षांतर देखील जोरदार सुरू आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त इनकमिंग हे भाजपमध्ये झालं आहे. महाविकास आघाडीमधील इच्छूकांनी तर भाजपमध्ये प्रवेश केलाच मात्र दुसरीकडे भाजपकडून या निवडणुकीमध्ये आपलेच मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला देखील मोठा धक्का बसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये मोठ्या संख्येनं इनकमिंग सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गटात सध्या नाराजीचं वातावरण आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार देखील घातला होता. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौर्यावर आहेत, एकनाथ शिंदे हे दिल्ली दौर्यावर असतानाच आता महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान, कल्याण- डोंबिवलीमध्ये मोठा राजकीय भूकंप पाहावयास मिळत आहे. महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आता शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाणाचा प्रचार सुरू झाला आहे. जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आता थेट भाजपचे प्ररदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अल्टिमेटमचं दिला आहे. कल्याण- डोबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला थेट युती तोडण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगमुळे शिंदे गट देखील आता अॅक्शन मोडवर आल्याचं पाहावयास मिळत आहे. शिवसेना गटानं आता थेट प्रचार सुरू केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या विकास कामामुळे 56 वरुन 80 नगरसेवक निवडणून आणायला वेळ लागणार नाही, असंही यावेळी अरविंद मोरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान कल्याण- डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटानं घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



Comments