राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय !
- Navnath Yewale
- Aug 19
- 1 min read

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्य सरकारने आरोग्य विभाग, रुग्णालय तसेच कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीसंदर्भात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील आरोग्यसेवेत सुधारणा होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळाने एकून चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचे रुग्णालय उभरण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागांतर्गत कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिटीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.697/3/6 मधील 2 हेक्टर 50 जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे वेंगुर्ला- कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट- क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर 29 दिवस तत्वावर कार्यरत 17 कर्मचार्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यासह राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयांचा आरोग्य क्षेत्रातील सुविधा सुधारण्यास मदत होणार असून लवकरच या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.



Comments