उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पार्थ, जय पवारांसह घेतली मोदी शहाची भेट
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 2 min read

नवी दिल्ली: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आधी प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी चायपे चर्चा झाल्यानंतर त्या पार्थ आणि जय पवार यांच्यासह संसद भवनात पोहोचल्या. दरम्यान, या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे तर्क लावले जात असताना, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्या रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाल्या. बुधवारी सकाळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पार्थ पवार, जय पवार, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रथम पवंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
संसदेतील पंतप्रधान कार्यालयात झालेल्या भेटीत पंतप्रधान मोदी आणि सुनेत्रा पवार यांच्यात सुमारे 40 मिनिटे चर्चा झाली, तर अमित शाह यांच्यासोबत जवळपास अर्धा तास संवाद झाला. उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना भाजप ठामपणे सोबत राहील, असा शब्द पंतप्रधानांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.
राजकीय चर्चा नाही - तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. “ अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. स्वत:च्या दु:खासोबत जनतेचे दु:ख स्वीकारत पक्ष आणि राज्याच्या हितासाठी त्यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केल्या” असे तटकरे म्हणाले.
या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न विचारला असता तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते म्हणाले, “ आमच्या पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही सामूहिक निर्णयाने अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी झालो होतो. तो निर्णय कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील” असे त्यांनी ठामपणे सांगितले . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एनडीएसोबत येण्याची तयारी दर्शविल्यास स्वागत कराल का, या प्रश्नावर “ जर-तरवर बोलणे योग्य नाही ” असे उत्तर देत त्यांनी प्रत्येक पक्षाला आपली भूमिका ठरवण्याच अधिकार असल्याचे नमूद केले.
रोहित पवारांची दिल्लीत पत्रकार परिषद : दरम्यान, सुनेत्रा पवार दिल्लीत असताना, रोहित पवार यांनीही दिल्ली गाठल्याने चर्चांना उधाण आले. बुधवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. “ अजित पवारांच्या विमानप्रवासात शेवटच्या क्षणी काय घडले, हे शोधून काढण्याची गरज आहे. ट्रान्सपॉन्डर का बंद करण्यात आला? धावपट्टी क्रमांक 11वर उतरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न का करण्यात आला? जर विमान धावपट्टी 29 वर उतरले असते तर कदाचित इतका मोठा अपघात झाला नसता” असा दावा रोहित पवार यांनी केला.



Comments