निवडणुक स्थगितीवरून लातूर कडकडीत बंद महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच घडलं, अमित देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप
- Navnath Yewale
- Dec 2
- 2 min read

लातूर: राज्यभरात नगर पंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तर लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या सांगण्यावरूनच स्थगित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच निलंगा बंदची हाक देण्यात आली होती.
ऐन मतदानाच्या दिवशी निलंगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्य निलंगा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापार्यांनी आपली दुकानं, प्रतिष्ठानं बंद ठेवून काँग्रेसच्या या बंदमध्ये सहभाग नोंदवला. निलंगा नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. पराभव पुढे दिसत असल्यामुळे ही निवडणुक स्थगित करण्याचा घाट भाजपने घातल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसंच ही निवडणुक स्थगित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचल्याचा आरोपही जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी या घटनेवर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मतदानाला 12-14 तास शिल्लक असताना लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. निवडणूक अयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी आणि लोेकशाहीविरोधी आहे. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या नऊ ते दहा वर्षापासून झालेल्या नाहीत, राज्यातील सत्ताधारी मंडळींना प्रशासनाच्या माध्यमातून एकाधिकारशाही गाजवता यावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका या ना त्याकारणाने लांबवण्याचा प्रयत्न होतो आहे. अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.
कोणत्याही परिस्थितीत दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात याव्यात असा पंचायतराज कायदा सांगतो, मात्र तांत्रिक कारणावरून या निवडणुका पुढे जातील याची व्यवस्था राज्यातील सत्ताधारी मंडळीकडूनच होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कुठे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक अयोगाने जाहीर केल्या परंतु, त्या सुरळीत पार पडणार नाहीत याची व्यवस्था आयोगामार्फतच केली जात आहे, राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणूका प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शेवटच्या दिवशी लातूर जिल्ह्यातील रेणापूर सह राज्यातील 22 नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याचा अनाकलनीय निर्णय निवडणूक अयोगाने घेतला, यात आणखी भयानक प्रकार म्हणजे, निलंगा नगरपरिषद निवडणुकीचे मतदान काही तासावर आलेले असताना ही निवडणुक स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
जिथे सत्ताधारी मंडळीच्या विरोधात जनतेचा कौल दिसतो आहे, तेथील निवडणुक स्थगित करण्याचा सपाटा निवडणूक अयोगाने लावल्याचे रेनापूर नगरपंचायत आणि निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या स्थगितीवरून दिसून येत आहे. मतदान चोरीच्या प्रकरणावरून संपूर्ण देशात निवडणूक अयोगाच्या विरोधात रान उठलेले असतानाच, आता निवडणूक अयोगाने निवडणूक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करून, आपण स्वायत्त नसून सत्ताधारी मंडळीच्या हातचे बाहुले असल्याचे सिद्ध केले आहे.
“ नगरपरिषद आणि नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी मंडळींनी समा,दाम, दंड या आयुधांचा सर्रास वापर केल्याचे सध्या राज्यभरातील वातावरणावरून दिसून येत आहे, ज्या ठिकाणी काहीही करून निवडणूक जिंकताच येत नाही असे लक्षात आले तेथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोग आणि सत्ताधारी मंडळीची ही कृती लोकशाही विरोधी आहे, सत्ताधारी मंडळींची ही दडपशाही जास्त काळ जनता सहन करणार नाही अशी टीका देशमुख यांनी केली.



Comments